Sunday, 21 June 2026

भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

 भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

·         अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या

अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन

 

नागपूर, दि. १९ - देशाला भविष्यात संरक्षणसज्ज ठेवायचे असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्र इंडियाचा अत्याधुनिक अॅल्युमिनिअम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प भारताचे आयात अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला मोठी चालना मिळेल आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

 

यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयुक्त सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांच्यासह संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनक्षमतेला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र कार्यक्रम, अंतराळ संशोधन, विमान उद्योग, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेले मोठ्या आकाराचे व गुंतागुंतीचे अॅल्युमिनियम मिश्रधातू घटक या प्रकल्पातून तयार करता येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अशा अॅल्युमिनियम घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi