आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत
वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्णय
मुंबई, दि. 21 : कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा 23 जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक संकटांचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी म्हटले आहे. समाजातील दुःख आणि अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात त्यांनी सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये; त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात आणि परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.
विशेषतः 'गो-सेवा' आणि गौसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करताना मंत्री राणे म्हणाले की, गौमातेची सेवा, गोशाळांना मदत, जनावरांच्या संगोपनासाठी योगदान तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. गरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रम हेच वाढदिवस साजरा करण्याचे खरे स्वरूप आहे.
कोकणातील बागायतदारांचे नुकसान, मच्छिमार बांधवांच्या अडचणी आणि राज्यातील पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक आनंदोत्सव साजरा न करणे आवश्यक आहे. जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हिच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल, असे मंत्री राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
तुमचा सेवाभाव हिच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी सर्वांना समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment