अंधेरी सब-वेतील पाणी साचण्याच्या समस्येवर
कायमस्वरूपी तोडगा लवकरच
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. 16 : अंधेरी सब-वे परिसरात पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी असेही त्या म्हणाल्या.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंधेरी सब-वे, दाऊद बाग आणि आझादनगर परिसरातील पूरस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अमित साटम, मूरजी पटेल, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मोगरा नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाल्याचा प्रवाह वळवणे, पाणी साठवण टाकी उभारणे तसेच नाल्याची क्षमता वाढवणे यांसारखे महत्त्वाचे पर्यायांचा विचार करावा. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबई कडून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जात असून, त्यानंतर अंतिम निर्णय
घेण्यात येणार आहे.
या उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाकडून यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
0000
No comments:
Post a Comment