राज्यात इंधन पुरवठा सुरळीत
- मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी उत्पादनात वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत उत्पादन 9000 मेट्रिक टनांवरून 11000 मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले असून पुरवठा साखळी मजबूत करण्यात आली आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम २६० प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा, त्यावर नियंत्रण तसेच दर निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनाकडे आहे. केंद्र शासनाने ७ मार्च २०२६ पासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. राज्यातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत असून नागरिकांमध्ये घबराट पसरू नये यासाठी रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि वृत्तपत्रांद्वारे नियमित माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील अफवांवरही नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून 9769919221 हा व्हॉट्सअॅप क्रमांक नागरिकांसाठी जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इंधन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर 20 टक्के इथेनॉल मिश्रण लागू असल्याचे सांगत त्यांनी गॅस पुरवठ्यात अडचणी आल्यास कोळसा व केरोसिनसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याचा विचार सुरू असल्याचे नमूद केले. केरोसिन पुरवठा साखळी काही प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी डीलर्समार्फत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment