Thursday, 5 March 2026

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे

 2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे


# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय


मुंबई. ( प्रतिनिधी ) – पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.

दरम्यान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारांमध्ये मनुष्यबळ व बसेस मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने दि. 05 मार्च 2026 रोजी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने 200 नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात 90 बसेस आणि सन 2027 - 28 या आर्थिक वर्षात 110 बसेस देण्यात येणार आहेत. तसेच या बसेस जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये पालघर आगारासाठी 10, सफाळे 10, वसई 15, अर्नाळा 15, डहाणू 05, जव्हार 15, बोईसर 10 आणि नालासोपारा 10 बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय विभागीय कार्यशाळा व संबंधित आगारांमधील रिक्त पदे येत्या 03 महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने भरण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

यावेळी आमदार विलास तरे यांनी दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “परीक्षेसाठी पिकअप वाहनातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास” या बातम्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मानव विकास मिशन अंतर्गत ‘गाव ते शाळा’ ही मोफत बस सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ व नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास आमदार विलास तरे यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल, असेही आ. तरे यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi