Friday, 27 February 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

– वनमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. २६ – बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पर्यावरणीय समतोल राखत आणि आदिवासी व पात्र रहिवाशांना न्याय देत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. महिन्याभरात ठोस निर्णय घेऊन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

       बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी पाडे व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेऊन पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे सांगितले. सात हजार रुपये अनामत भरलेल्या पात्र कुटुंबांना घरे देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वनमंत्री नाईक म्हणाले कीअतिक्रमित झोपडपट्टीतील सात हजार रुपये भरलेल्या पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खासगी ३० एकर जागेवर टीडीआरच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उद्यानातील मूळ रहिवाशांचे ९० एकर जागेवर ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील बांधकाम करून पुनर्वसन करण्याची शासनाची तयारी आहे. आरे कॉलनी परिसरातील उपलब्ध जागेबाबत झोनल मास्टर प्लॅन तयार केला जात असून महिन्याभरात निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन विषय निकाली काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उद्यानातील आतील पाड्यांना सुविधा देण्यास न्यायालयाने नेमलेल्या समितीने मनाई केली आहे. मात्र उद्यानाबाहेरील वस्तींसाठी, उद्यानातून गेलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीला मान्यता दिली जाईल, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi