Wednesday, 4 February 2026

विकसित भारताच्या मार्गाला गती देणारा आणि भारताला सक्षम व आत्मनिर्भर


 विकसित भारताच्या मार्गाला गती देणारा आणि भारताला सक्षम व आत्मनिर्भर बनवणारा हा अर्थसंकल्प - कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन


मुंबई, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत संकल्पनेला चालना देणारा असून देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा आहे, अशी प्रतिक्रिया कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
लोककल्याण कार्यालय, कांदिवली पश्चिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प उत्पादन व गुंतवणूक वाढीस पोषक असून भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग आणि उद्योजक या सर्व घटकांच्या उन्नतीचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकास या तत्त्वावर आधारित आर्थिक विकास, क्षमतावृद्धी आणि सर्वसमावेशक संसाधनवाटपावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदरे, ऊर्जा, गृहनिर्माण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे भातखळकर म्हणाले.
बायोफार्मा क्षेत्रासाठी १०,००० कोटी रुपये, सेमीकंडक्टरसाठी ४०,००० कोटी रुपये, सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर, राष्ट्रीय जलमार्ग आणि एमएसएमईसाठी स्वावलंबी भारत निधी यामुळे आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक मजबूत होईल, असा विश्वास कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.
भारताला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi