महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
मुंबई, दि. 14 : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात 15 हजार 908 उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा 15 डिसेंबर 2025 रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.
मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधीत ठिकाणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरवात होईल. मतदारांमध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिला; तर 4 हजार 596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांपैकी एकूण 3 हजार 196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment