राज्य बालनाट्य संदर्भातील वृत्त खोडसाळपणाचे - सांस्कृतिक कार्य संचालनालय
जळगाव (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस बालरंगभूमी परिषदेची वेगवेगळ्या संस्था व व्यक्तींकडून माध्यमांमध्ये बदनामी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सविस्तर खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. बालरंगभूमी परिषदेने यापुर्वी जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणे राज्य बालनाट्य स्पर्धा हायजॅक केली नाही तर दि. ४ ऑगस्ट २०२५ च्या पत्राप्रमाणेच बालरंगभूमी परिषद स्थानिक समन्वय व इतर बाबींमध्ये कार्यरत असणार आहे. सदर बाबीच्या खुलासा राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांचा खोडसाळपणा उघड झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालकलाकारांबाबतच्या सर्व उपक्रमांमध्ये बालरंगभूमी परिषद सदैव सहकार्य करण्यास तत्पर आहे. महाराष्ट्रातील बालकलाकारांसाठी बालरंगभूमी परिषद कायम स्वतःचे उपक्रम राबवित राहील आणि नव्या पिढीसाठी कलाक्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी बालरंगभूमी परिषद स्वतःला कार्यरत ठेवेल.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असल्यामुळे बालकांच्या भावविश्वाशी व कलागुणांशी संबंधित काम या संस्थेमार्फत चालत असते. त्यामुळेच बालनाट्य स्पर्धेत बालरंगभूमीने विना मोबदला स्थानिक आयोजनात सहकार्य आणि समन्वय करावे असे बालरंगभूमी परिषदेबरोबरच्या बैठकीत ठरलेले होते. त्यानुसार ४ ऑगस्ट, २०२५ रोजी बालरंगभूमी परिषदेस तसे पत्रही देण्यात आले होते. या पत्रानुसार समन्वयक नावे सुचवणे, परीक्षक नावे सुचवणे याबरोबरच अन्य काही बाबीसाठी बालरंगभूमी परिषदेने सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले होते. बालरंगभूमी परिषदेने परिक्षकांची व समन्वयांची नावे सुचवली असली तरी, अंतिम निवड सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बालरंगभूमी परिषदेस दिलेल्या पत्रामुळे काही माध्यमांमधून या पत्रांमधील काही मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आलेले होते. वास्तविक पाहता या पत्रामध्ये बालरंगभूमी परिषदेने स्पर्धा आयोजनात स्थानिक सहकार्य करावे आणि स्थानिक समन्वय करावा असे अभिप्रेत आहे, याचा अर्थ महाराष्ट्र राज्य हौशी बाल नाट्य स्पर्धा हायजॅक केली असा होत नाही.
या पत्रामध्ये स्पष्टपणे बालरंगभूमी परिषदेने स्थानिक आयोजन सहकार्याने समन्वय करावा असे नमूद करण्यात आलेले होते. मात्र निवेदनाद्वारे काही संस्थानी ही स्पर्धा संपूर्ण आयोजनाकरीता दिली आहे असे म्हटले होते. स्पष्ट करण्यात येते की, यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण कोणत्याही संस्थेस शासनाने ही स्पर्धा संपूर्णपणे आयोजन करण्यासाठी दिलेली नाही. या स्पर्धेदरम्यान स्थानिक सहकार्य आणि समन्वय करण्यासाठी बालरंगभूमी ही शासनास पुर्वीपासून मदत करत होती व यापुढेही मदत करेल अशी अपेक्षा आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्णयाचा काही संस्थांनी विपर्यास केला तसेच या सदंर्भात केलेल्या खुलासाचा नोंदणीकृत नसलेल्या एका रंगभूमी कलावंत संघटनेंने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते, हे सांस्कृतिक चळवळीसाठी बाधक आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोणत्याही संस्थेच्या किंवा राजकीय पक्षाच्या / संघटनेच्या राजकीय दबावाखाली बळी पडून हा निर्णय घेतलेला नाही. गेली अनेक वर्षे सांस्कृतिक कार्य संचालनालय विविध संस्थांची मदत घेऊन विविध स्पर्धा आयोजित करीत असते. त्यामुळे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कोणीही गैरसमज पसरवू नये. सदरील स्पर्धा पूर्णपणे पूर्वीपासूनच शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. कोणत्याही खाजगी संस्थेला याचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीपासून शासनाच्या वतीने स्पर्धेचे नियोजन करण्यात येत असते, तसे यावर्षी देखील होणार आहे. या वृत्ताचे स्वागत बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व २७ शाखांचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment