राज्य विमा महामंडळाच्या सेवांचा लाभ पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा
- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
मुंबई, दि. ४ : राज्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत सध्या सुमारे ४८ लाख कर्मचारी नोंदणीकृत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत आरोग्यविषयक तसेच आर्थिक लाभांच्या सुविधा गतीने पोहचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक मंडळाच्या ११६ व्या बैठकीत कामगार मंत्री ॲड.फुंडकर बोलत होते. बैठकीस कामगार विभागाचे सचिव कुंदन एस, महामंडळाचे आयुक्त रामजीलाल मीना, तसेच प्रादेशिक मंडळाच्या सदस्या संगीता जैन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित सुविधा, विमा लाभ, आर्थिक मदत, सुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित करणे अत्यावश्यक आहे. एमआयडीसी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची उभारणी करावी. तसेच कर्करोगग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी. रुग्णालयांमधील सर्व वैद्यकीय अहवाल ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रणाली उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच ज्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाहीत, तेथे कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करून सेवा सुरळीत ठेवाव्यात, असेही ॲड. फुंडकर यांनी सांगितले. रुग्णसंख्या कमी असलेल्या रुग्णालयांचे विलिनीकरण आणि २५ नवीन रुग्णालयांच्या बांधकामास गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
000
No comments:
Post a Comment