प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
- राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा
मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह पुणे या ठिकाणी होणार आहे. कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील पालघर, रायगड, धुळे छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.
सद्य स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment