भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल
- मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम
मुंबई, दि. १० : मॉरिशस हा भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार असून येथे मोठ्या व्यावसायिक संधी आहेत. भारत-मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन करुन भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल, असा विश्वास मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांनी व्यक्त केला.
मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांच्या दोन दिवसीय मुंबई भेटीदरम्यान हॉटेल ट्रायडेंट येथे बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा, शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह विविध उद्योगसमूहांचे प्रमुख उपस्थित होते. भारतीय विदेश मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) आणि मॉरिशस आर्थिक विकास मंडळ यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
श्री.रामगुलम यांनी दोन देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करणे, वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे तसेच परस्पर गुंतवणुकीला चालना देणे या उद्देशाने भारत आणि मॉरिशसदरम्यान झालेल्या व्यापार आर्थिक भागीदारी करारांतर्गत (सीईसीपीए) झालेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, २०२४ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार ८०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सहा हजार कोटी रुपये) पर्यंत पोहोचला आहे. मॉरिशसची निर्यात ५० दशलक्ष डॉलर्सवरून १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून वित्तीय सेवा, पर्यटन तसेच भारत-आफ्रिका-मॉरिशस त्रिपक्षीय सहकार्याद्वारे व्यापारातील असमतोल कमी करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यास मॉरिशस सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून हे क्षेत्र भारतीय कंपन्यांसाठी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उच्च तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण व मनोरंजन उद्योग यांसारख्या क्षेत्रांत नवे संधी-क्षेत्र ठरेल, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment