गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. ११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवत भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचे नव्हे, तर संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. नव्या रस्त्यांचे जाळे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, बुलेट ट्रेन प्रकल्प, वाय-फाय सिटीज आणि स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचे रूपांतर घडवले जात आहे. या कालखंडात तब्बल २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. रोजगारनिर्मिती, डिजिटल सेवांचा विस्तार आणि कृषी, उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांनी सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले
No comments:
Post a Comment