चावी मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण हा भावनिक क्षण आहे. जुन्या १६० चौरस फूट घरांतून आता ५०० चौरस फूट सुसज्ज घरात जायला मिळत आहे. चावी हातात घेतलेल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, बीडीडी चाळ या ‘मिनी भारताने’ देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, क्रांतिकारकांची प्रेरणा, तसेच सामाजिक-राजकीय घडामोडींचे हे केंद्र राहिले आहे. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारी येथे घडले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधून उभा राहिलेला चाळीचा जिवंत इतिहास आजही स्मरणात आहे.
या प्रकल्पातील दर्जेदार बांधकाम, जागेचा सुयोग्य वापर आणि रहिवाशांच्या विश्वासाला पात्र राहण्याचे काम केले गेले आहे. या प्रकल्पाप्रमाणेच धारावीकरांचे सुसज्ज घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुंबईतील सामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रहिवाशांनी घरे कोणत्याही मोहात न पडता विकू नये. ही आपल्या कष्टाची कमाई आहे आणि ती जपावी. मुंबई शहरात राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना तसेच पुनर्विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.
No comments:
Post a Comment