Saturday, 19 July 2025

बोगस बियाणे आणि खते विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार

 बोगस बियाणे आणि खते विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार

-         कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 18 :- अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. शेतकऱ्यांना बोगस बियाणे, कीटकनाशक खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री, ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

       विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी पाचेगाव (ता. नेवासा जि. अहिल्यानगर) मध्ये कपाशीच्या बियाणांच्या विक्रीमध्ये होत असलेला गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

कृषिमंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बोगस बियाणेकीटकनाशकेखते यांची विक्री तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

पाचेगाव येथील मे. त्रिमूर्ती ऍग्रो सेंटरची तपासणी केली असता तेथे जादा दराने बियाणांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने त्यांचा बियाणे विक्री परवाना व कापूस विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात १५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत कृषी विभागाने बियाणे कायद्यांतर्गत २ आणि खत नियंत्रण कायद्यांतर्गत ३ गुन्हे दाखल करून १२.३४ लाखांचा साठा जप्त केला आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केलेल्या ३५ निविष्ठा विक्री परवान्यांवर निलंबन/रद्दची कारवाई केली आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi