महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार
अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप
मुंबई, दि. २४ : देशाच्या विकासात अंदाज समिती तसेच वित्तीय समित्यांची महत्वपूर्ण भूमिका असून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुशासनाचा कणा आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास गौरवशाली आणि प्रेरणादायी राहिला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक कल्पक योजना दिल्या आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.
संसदेतील व सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी राज्यसभा उपसभापती श्री. हरिवंश, अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जैसवाल, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसद आणि सर्व राज्ये व संघ राज्य क्षेत्रांच्या प्राक्कलन समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, महाराष्ट्र ही भक्ती, शक्ती आणि प्रगतीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. सन १९७० मध्ये महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली ती देशाने स्वीकारली. सरकारी खर्चाचे नियोजन, कार्यक्षमतेचे मूल्यमापन आणि धोरणात्मक सुधारणा यामध्ये अंदाज समित्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल सुरू असून हा अमृतकाळ महत्वपूर्ण ठरेल, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment