संसदीय समित्यांमध्ये जनतेचा सहभाग आणि भागीदारी महत्वाची
- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
संसदीय समित्या छोटी संसद’ म्हणून काम करतात. जनतेच्या पैशाचा नीट वापर होतो की नाही, यावर लक्ष ठेवतात. आर्थिक शिस्त, पारदर्शकता यासाठी समित्यांचे महत्त्व अधिक आहे. त्यासाठी जनतेचा सहभाग आणि भागीदारी महत्वाची आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, दोन दिवसीय परिषदेत देशभरातील सदस्यांनी विधानमंडळातील अनुभव सांगून विचारमंथनातून सामाजिक, आर्थिक योजनांच्या परिणामकारकतेचा आढावा घेतला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संसदीय समित्यांनी डेटा अॅनालिटिक्स, डीबीटी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सार्वजनिक निधीच्या वापराची देखरेख करावी आणि समित्यांचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपसभापती हरिवंश सिंह म्हणाले, गेल्या दोन दिवसांत अंदाज समित्यांच्या संमेलनामध्ये देशभरातून आलेल्या प्रतिनिधींची अंदाज समित्यांच्या कार्यपद्धती, भविष्यातील जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या ७५ वर्षांत या समित्यांनी पारदर्शकपणे कार्य केले आहे. भारत एक प्रगतीशील राष्ट्र म्हणून प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करताना समित्यांचे योगदान महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरेल.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, कार्यपालिका जर संसदीय समित्यांच्या शिफारशींवर योग्य वेळी कार्यवाही करत असतील, तरच या समित्या प्रभावी ठरतात. विधानसभेच्या मंजुरीशिवाय कार्यपालिका पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींचा विनियोग योग्य ठिकाणी होत आहे का याची खात्री करण्याचे काम प्राक्कलन समित्यांचे आहे. पूर्वी या समित्यांचे अधिकार मर्यादित होते, पण जनतेप्रति उत्तरदायित्वामुळे त्यांचे क्षेत्र वाढले. महाराष्ट्रातील आरे कॉलनी, रेशन वितरण यांसारख्या विषयांवर समित्यांनी मोलाची शिफारस केली आहे. समितीची शिफारस जर ठराविक कालावधीत अंमलात आली तर समिती व्यवस्था अधिक प्रभावी ठरेल असे मत त्यांनी यावेळी मांडले.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आभार मानले.
0000
No comments:
Post a Comment