हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग;
महाराष्ट्राची भाग्यरेषा
राज्याची प्रगती अधिक गतीमान करण्यात दळणवळण सुविधांची व्यापक उभारणी महत्वाची बाब आहे. त्याला प्राधान्य देत शासन नागरिकांच्या प्रवास सुविधेच्या दृष्टीने अनेक प्रकल्प गतीने पूर्ण करत आहे.यामध्ये सर्वात महत्वाचा ठरलेला 701 कि.मी लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यासह पूर्णपण सुरु होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. दुसऱ्या टप्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकुण 80 कि.मी लांबीचे लोकार्पण दि. 26 मे 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या 25 किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. 4 मार्च 2024 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते. एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरु असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, समृद्धी महामार्गाची उर्वरित 76 कि. मी लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण दि. 05 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आहे.
*प्रकल्पाची व्याप्ती*
राज्याच्या पाच महसुल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड हे 14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन "ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे" ने प्रवास 8 तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतुक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.
हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा - वेरुळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.
No comments:
Post a Comment