जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा
नवभारताचा आत्मा
- उपराष्ट्रपती जगदीप धनखड
मुंबई, दि. २८ : “जनसंख्या विज्ञान, लोकशाही आणि सांस्कृतिक विविधता हे नवभारताचे आत्मिक स्तंभ आहेत. या त्रिसूत्रीचा अभ्यास आणि तिचे संरक्षण ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (IIPS) ६५व्या आणि ६६व्या पदवी प्रदान समारंभात केले.
या समारंभात उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायन व खत मंत्रालय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार सना मलिक, संस्थेचे संचालक प्रो.डी.ए.नागदेवे आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, “ही केवळ पदवी मिळवण्याची वेळ नाही, तर नवभारत घडवण्याच्या जबाबदारीची सुरुवात आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपली लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि विविधता हे घटक भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे दिशादर्शक आहेत.”
डेटा म्हणजे देशाचा दिशा-निर्देश
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आधुनिक भारतात लोकसंख्याशास्त्र हे केवळ आकडेवारी नाही, तर ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे. बेरोजगारी, आरोग्य सेवांतील असमानता, आणि प्रादेशिक असंतुलन या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य डेटाचा उपयोग अत्यावश्यक आहे. जनसंख्याशास्त्राचे विद्यार्थी, हे बदल घडवू शकता.”
“सरकारने आगामी जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल,” ‘IIPS’ सारख्या संस्थांना या डेटाचे विश्लेषण करून सर्वसमावेशक धोरणं तयार करण्यासाठी महत्वाचे योगदान देण्याचे आवाहन श्री. धनखड यांनी केले.
No comments:
Post a Comment