यवतमाळ जिल्ह्यातील घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या भूमिहीन कुटुंबांना
घरकुले उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करा
– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक
मुंबई, दि. 18 : यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल नसलेल्या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी कार्यवाही करा, भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठाणामधील जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके, आमदार राजू तोडसाम, आमदार आमश्या पाडवी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल व यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यात शासनाने 68 हजार घरकुलाना मंजूरी दिली आहे. गावठाणच्या जागेवर वर्षानुवर्ष भूमिहीन कुटुंब राहत आहेत. या पात्र कुटुंबांना घरकुल उपलब्ध व्हावे, यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
मंत्री श्री. गोरे म्हणाले, गावठाणच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांच्या घरकुलाची जागा नियमाकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा.
बैठकीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत अंतर्गत पांदण रस्ते, विविध गावांमध्ये रस्त्याची कामे, यासह त्रिशंकू स्थिती असलेल्या पुनर्वासित गावाबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास 31 गावांमधील ग्रामपंचायत वार्ड निर्मिती, संबंधित ग्रामपंचायतीमधील समावेश आदीबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जामवाडी, दर्यापूर, शिवनी सह विविध गावांच्या बाबत चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment