रेडिओचे योगदान
‘आकाशवाणी’ हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा "मास मीडिया" म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमाचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असून, अनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नवमाध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही कालसुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.
महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओची २८ केंद्रे, एफ एम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटी, रेडिओ वन, मॅजिक एफएम, माय एफ एम, टोमॅटो एफ एम, अशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सही सुरू आहेत.
रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफ एम रेडिओ व कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचाराच्या प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा वापर करणे हा या महोत्सव व पुरस्काराचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे सांस्कतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment