राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी वेगवान समनव्यन
'सचेत' प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
२४ ते २६ मे दरम्यानच्या अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय
मुंबई, दि. २७ :- अतिवृष्टीच्या आपत्ती कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत 'सचेत' प्रणालीवरून लोकांना पाऊस व वीजबाबत पूर्व सूचना दिल्या जात आहेत. 'सचेत' या प्रणालीवरून लोकांना पाऊस व विजेचे पूर्व सूचना देताना २६ व २७ मे या दोन दिवसांमध्ये नागरिकांना १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले, यातून ५२ पूर्व सूचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली
राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये २४ ते २६ मे मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बचाव व मदत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. या केंद्रात संपर्क साधण्यासाठी २४x७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध असल्याचे श्री. खडके यांनी सांगितले.
मदत व बचाव कार्यासाठी पथके
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशा एकूण चार पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. अतिवृष्टी मध्ये बाधितांना नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या देखील प्रवण ठिकाणांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील मुंबई शहर, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड व मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. मुंबई शहर आणि उपनगर हार्बर लोकल वाहतूक रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे फायबर ऑप्टिक्स केबल कट झाल्याने काही ठिकाणी मोबाईल टॉवर यंत्रणा विस्कळीत झाली होती, ती तत्काळ समन्वयाने पूर्वस्थितीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालवधीत दौंडमध्ये सर्वात जास्त ११७ मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये १०४.७५ मिमी आणि इंदापूरमध्ये ६३.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये २५ घरांची अंशत पडझड झाली आहे.
No comments:
Post a Comment