महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च 2025) शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील 10 वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :
2015-16 : 61,482 कोटी
2016-17 : 1,31,980 कोटी
2017-18 : 86,244 कोटी
2018-19 : 57,139 कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 : 1,64,875 कोटी
000
संजय ओरके/विसंअ/
वृत्त क्र. 2261
आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क
मुंबई, दि. २९ : राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व उपनगर मध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघर मध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत ) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २९ मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात २९.५, रायगड २१.९, रत्नागिरी १०.१, सिंधुदुर्ग १३, पालघर ३.१, नाशिक २६.३, धुळे १५.९, नंदुरबार ५.२, जळगाव ३.२, अहिल्यानगर ४.३, पुणे ४.८, सोलापूर ५.७, सातारा ३.९, सांगली १.६, कोल्हापूर ०.७, छत्रपती संभाजीनगर २.८, बीड १, लातूर २.१, धाराशिव ९.७, परभणी ०.१, हिंगोली ०.१, यवतमाळ ०.१, वर्धा ४.७, नागपूर २०.८, भंडारा १.७, गोंदिया ५, आणि गडचिरोली ०.९.
दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत झाली आहे. मुंबई उपनगर येते झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात २६ प्राणी , वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आइस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन वायू गळती थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment