मुंबईत १ ते ४ मे वेव्हज (WAVES) चे आयोजन
- मुख्य सचिव सुजाता सौनिक
· जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद
· केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मुंबई, दि. ७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन ,वेव्हज (WAVES) या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. जीओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटर, मुंबई येथे दि.१ ते ४ मे २०२५ रोजी ही परिषद होईल. या परिषदेमध्ये भारतातील जागतिक स्तरावरील मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रातली उद्योजक, धोरणकर्ते आणि नवकल्पनाकार सहभागी होणार असून 'मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योगाच्या संधी आणि आव्हाने' यावर परिषदेत चर्चा केली जाईल. या पार्श्वभूमीवर या परिषदेची नियोजनबद्ध तयारी सर्व विभागांनी समन्वयातून करावी असे निर्देश सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या दालनात जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES) आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव संजीव शंकर, सी. सेंथिल राजन, अजय नागभुषण एम एन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी.अन्बलगन, ‘एमआयडीसींचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू,उद्योग आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,फिल्म डिव्हीजनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, विशेष पोलिस महासंचालक देवेन भारती,मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यासह केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक, आकाशवाणी,दूरदर्शन आणि वेव्हज परिषदेचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
भारतीय माध्यम क्षेत्र जागतिक स्तरावर
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, जगभरातील एकात्मतेसाठी भारतीय आध्यात्मिक वारसा जपणे,भारताला जागतिक कंटेंट हब आणि सामग्रीचा मोठा निर्यातदार बनवणे, बौद्धिक संपत्तीची समृद्ध परिसंस्था तयार करणे, भारतीय संस्कृती व भाषांची विविधता जपणे,भारतीय माध्यमांची जागतिक बाजारातील उपस्थिती वाढवणे,भारताला मोठ्या जागतिक गुंतवणूक बाजारपेठेचा केंद्रबिंदू बनवणे, भारतीय आणि जागतिक भागीदारांमध्ये सहकार्य आणि गुंतवणूक वाढवणे हा परिषदेचा उद्देश आहे. विविध देशांचे प्रतिनिधी, भारतीय उद्योग प्रतिनिधी आणि व्यापारी संघटना, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आलेले प्रतिनिधी,कंपन्या आणि स्टार्टअप्स,तंत्रज्ञान कंपन्या,सह-उत्पादन कंपन्या आणि चित्रपट निधी संस्था, खरेदीदार आणि विक्रेते, विशेष कौशल्य असलेले प्रतिनिधी – दिग्दर्शक, निर्माते, सामग्री निर्माते, पटकथा लेखक यामध्ये सहभागी होतील असे जाजू यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment