साहित्यप्रवाहांनी समृद्ध
मराठी साहित्याला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विज्ञान साहित्य, प्रादेशिक साहित्य, बालसाहित्य, मुस्लीम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, बालसाहित्य अशा साहित्यप्रवाहांनी अतिशय समृद्ध केलेले दिसते. मराठीच्या विविध बोलींतून ही साहित्यनिर्मिती केलेली दिसते.
१९९० च्या नंतर जागतिकीकरणाचा परिणाम मराठी साहित्यावरही झालेला दिसतो भोगवाद, चंगळवाद, उपभोगवाद, विलासवाद, ग्राहकवाद, बाजारवाद, वस्तुवाद, लैंगिकतावाद या प्रकारच्या बाबींची वेगाने प्रतिष्ठापना करीत जागतिकीकरण वाढत चालले आहे. रंगनाथ पठारे, मकरंद साठे, श्रीधर नांदेडकर, जयंत पवार, विश्राम गुप्ते, सदानंद देशमुख, राजन गवस, आसाराम लोमटे आदी साहित्यिकांच्या लेखनात ही संवेदना प्रकटलेली दिसते.
संगणकादी नवे तंत्रज्ञान आल्यावरही मराठीचा वापर प्रचंड वाढला आहे. मराठी ब्लॉग्स,संकेतस्थळे वाढली आहेत. मराठीतील कोशवाङ्मय जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रसारमाध्यमांनी मराठी भाषा साचेबद्ध न ठेवता तिच्यात कालानुरूप बदल केले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांनी मराठी भाषाभ्यासाला व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली जाईल. बोलीभ्यास संशोधन, अनुवाद प्रक्रिया यांना गती मिळेल. ग्रंथालये सशक्त होतील. पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन होईल. त्यामुळे डिजिटल माध्यमांतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
अनेक जाती-धर्मांचे लोक मराठी भाषा बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने आपल्या पोटात सामावून घेतले आहे.खांद्यावर माय मराठीची पताका घेतलेल्या साडे बारा कोटींची ही भाषांमाजी भाषा साजिरी आहे.
-----
No comments:
Post a Comment