Thursday, 10 October 2024

कथा पुण्यातील एका चौकाची....

 सत्यकथा


*कथा पुण्यातील एका चौकाची....*



     शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले. 


मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता. 

अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती...

मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली...


नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे....

भाऊंच्या हाताखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते...

      

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती. एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते. याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती...


अशाच एका खलबतात जनकोची शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला...

तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला...

बघताबघता १०,००० सैन्य गारद केले...


पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले.. 

पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबूनच पहात होते...

शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशिवभाऊंकडे परत आला. भाऊंनी त्याचा सत्कार केला. तसा जनकोजींनी भाऊंना प्रश्न विचारला, "माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता? आणि बळवंतराव काय करत होते जरा विचारा त्यांना.."

त्यावरुन शब्दाला शब्द झाला.. 

दरबार संपला....

सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले...


पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच....

आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला...

तिने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले..

आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली. 

एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले...

आर्यपत्नी म्हणाली ,"या पराक्रम करुन आलात.. ओवाळते पंचारतीने.. आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात." बळवंतरावांनी मान खाली घातली..

तसा पत्नीच्या तोंडाचा पट्टा सुटला...

ती म्हणाली, "उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव? एका नामर्दाचा? की पळपुट्याचा? लाज कशी वाटली नाही तुम्हाला?"

   

पत्नी ताडताड बोलत होती...

आणि बोलता बोलता म्हणाली, "जा परत, गिलच्यांना ठेचा. त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका.. जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन...."

      

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले....

सत्वर हात तलवारीवर घालून निघाला..

बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकली...

बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले...

हर हर महादेव ..

जय भवानी..

जय शिवाजी.. 

आरोळी घुमली....

अफाट कापाकापी सूरु झाली....

गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते..

बळवंराव त्वेषाने दांडपट्टे फिरवत होते...

त्यांचे कान फक्त आकडे एकत होते...

हजार...

पाचहजार...

आठहजार....

एकच कापाकापी...

रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग दिसू लागला...

एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला. फिरणाऱ्या दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल...

साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात....

बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले...

प्रत्यक्ष स्वामी....

फक्त माझ्यासाठी...

खरंच धन्य झालो मी आज...

पण एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली...

एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या...

भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला....

सदाशिवभाऊनी त्या अचेतन देहाला मिठीच मारली...

आदर्श प्रेमाच हे उदाहरण....

    भाऊंनी तो देह मागे आणला. पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली..

बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली...

त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते...

"बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे, किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको..."

पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली...

तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की, याचा सांभाळ आपण करा...

आणि मोठा झाला की फक्त एव्हढंच सांगा त्याला "तुझे आई वडील का मेले" 

हीच आठवण द्या...

बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल, कारण तो वीराचा पुत्र आहे.....

पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला....

मराठे तळहातावर शीर घेऊन लढले. 

देशासाठी ..

धर्मासाठी....

महाराष्ट्राची एक तरुण पिढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली ...

         पण,पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची...

अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला....


पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा....

राष्ट्रभक्तीचा....

आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीला धडक दिली...

पार सिंधूपर्यत भगवा रोवला....

यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता...

पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता...

*आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले....तो पोर म्हणजेच...लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा...*

*आप्पा बळवंत मेहेंदळे....*

*आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा.....*


त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली....

आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले


 *"आप्पा बळवंत चौक..."*


     या चौकाच्या नावाच्या निमित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे...

स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे... 

आणि 

आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे....


राष्ट्रासाठी स्वतःची आहुती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत


 *आप्पा बळवंत चौक* 

या नावाचा आज अर्थ उमगला.🙏🏼

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi