Saturday, 16 September 2023

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव;

 








मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव;


विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण



औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : ‘मराठवाडा मुक्ती दिनाचा विजय असो’…! ‘मराठवाडयाचा जयजयकार’…! ‘मराठवाड्याचा विजय असो’…! ‘भारत माता की जय’…! अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्त होते, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.


आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली. शहराच्या विविध भागातून फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.


विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन


मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.


केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देताना मराठवाड्याला निजाम राजवटीपासून कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा स्वातंत्र्याचा लढा कसा लढला याची माहिती आपल्या मनोगतात दिली. भविष्यात आपल्या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


प्रास्ताविकात जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने शहरात तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श अंगीकारण्यास सांगितले.


तत्पूर्वी यश शिंपले, रवींद्र बोरा, सारा भावले, वैष्णवी मस्के, आर्या नाईक या विद्यार्थ्यांनी मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढा या विषयावर मनोगत व्यक्त केले.


यावेळी माजी सैनिकांचा सहभाग असणाऱ्या नागरिक मित्र पथकातील सदस्यांचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  


00000


 


 



 


वृत्त क्र. 3111


मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या प्रेरणादायी व स्फूर्तीदायी


लढ्यापासून बोध घेत कार्य करण्याची गरज


अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेतील सूर


 


औरंगाबाद, दि. १५ (विमाका) : मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असून यापासून सर्वांनी बोध घेत कार्य करण्याची गरज असल्याचा सूर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत उमटला.


औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने 'मराठवाडा मुक्तीसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने वंदे मातरम् सभागृह येथे ‘मुक्तीसंग्रामात धगधगता मराठवाडा' आणि 'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, व्याख्याते सारंग टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, उपस्थित होते.


मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान - सारंग टाकळकर


'मुक्तीसंग्रामात धगधगता मराठवाडा' या विषयावर व्याख्यान देताना श्री टाकळकर म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढाईत सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, गोविंद पानसरे, दगडाबाई शेळके, माणिकचंद पहाडे, नारायण पवार अशा विविध स्वातंत्र्य सेनानींचे मुक्ती संग्रामात मोठे योगदान होते. भारतीय सैनिकांनी निझामाविरुद्ध 'ऑपरेशन पोलो' ही मोहीम राबवून निजामाच्या अधिपत्याखालील सर्व भाग काबीज करत हैद्राबाद संस्थान निजाम मुक्त केले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून हा लढा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.


             स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन अत्यंत तळमळीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विलक्षण असा लढा लढला गेला. यामध्ये सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला, २५ सत्याग्रहींनी तुरुंगवास भोगला, तर 102 वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.


मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी रणरागिणींची साथ - डॉ. रश्मी बोरीकर


'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला स्वातंत्र्यसैनिक मुक्ती लढ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतःच्या जीवाची, पर्वा न करता या महिला स्वातंत्र्यसैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम केले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी रणरागिणींनी खंबीरपणे साथ दिली. मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.


            यावेळी 'हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील बालवीर' या ना

टकांचे सादरीकरण करण्यात आले.


0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi