वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला
वालचंद हिराचंद यांनी तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला: राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न
मुंबई : भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री, अॅग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा सन्मानपूर्वक पदग्रहण समारंभ झाला.
लोकसभा अध्यक्ष ओमजी बिरला म्हणाले, आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे.
आपण शाळेत असताना 'मेड इन जर्मनी'च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने 'मेड इन जपान'चा काळ आला व अलीकडे 'मेड इन चायना'चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक 'मेड इन इंडिया'चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले. वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशाच्या उद्योग, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांना व्यावसायिक बनण्याकडे प्रोत्साहन देत आहे.
शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक व सीईओ चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला. दि शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कॅप. बिनेशकुमार त्यागी, अतिरीक्त मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र सर्कल चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई यांचाही सत्कार झाला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश राध्येशाम खाबणी यांचा सन्मानपूर्वक सत्कार झाला.
दरम्यान महाराष्ट्र चेंबरच्या वतीने नाशिक येथे 6 ते 9 ऑक्टोबर, 2023 रोजी होत असलेल्या ‘मायटेक्स एक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चेंबरचे ट्रस्ट बोर्ड चे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उत्तर महाराष्ट्र चेअरमन कांतीलाल चोपडा, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment