Friday, 21 October 2022

भटक्या कुत्र्यांनी उच्छाद .

 मुंबई शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी उच्छाद आणला आहे. सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्यात अडथळा आणणाऱ्याांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश नुकतेच प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी करून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम तीव्र करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्र आ. भातखळकर यांनी आयुक्तांना दिले आहे.


याबाबत आ. भातखळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांना स्वत:च्या घराशिवाय इतरत्र कोठेही खाद्य पुरवले जाऊ नये, तसे झाल्यास दंड आकारण्याची मुभा न्यायालयाने प्रशासनाला दिली आहे. कोणत्याही नियमाने किंवा निवाड्याने भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणतेही बंधन नसल्याचे न्यायालयाने खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून लहान मुले, महिला, वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण बनले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. आता तर न्यायालयानेच त्यांना या कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले असल्याने कारवाईत अडथळा येण्याचा प्रकार घडणार नाही. त्यामुळे आपण पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे आ. भातखळकर म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi