Friday, 27 May 2022

पेशवे

 *गंगाबाई…एक दुर्लक्षित पेशवीण*

संकलन - सुधीर लिमये पेण

पेशवाईतील प्रत्येक पेशवे पत्नीच्या नशिबी वैधव्य लिहिलेले दिसते. असे असुनही या प्रत्येक स्त्रीला पती निधना नंतर व्यवस्थित आयुष्य जगता आले. अपवाद रमाबाईंचा कारण त्या सती गेल्या. त्या काळची कुटुंब संस्था, पेशवे घराण्याचा दरारा आणि समाजात असलेला पेशव्या बद्दलचा आदर या सगळ्या मुळे या स्त्रियाचे आयुष्य सुसह्य झाले असावे.

एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित. त्यातील राधाबाई, काशीबाई किँवा रमाबाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किँवा बोलले जाते. पण एक दुर्लक्षित राहिली.. ती म्हणजे गंगाबाई .

गंगाबाई म्हणजे नारायण राव पेशव्यांची पत्नी, आजही त्यांच्या बद्दल फारच कमी माहीती मिळते.

कृष्णजी हरी साठ्यांची ही कन्या २२ एप्रिल १७६३ पेशव्याची सुन होऊन शनिवार वाड्यात आली. नारायणराव आणि गंगाबाईचे लग्न सिंहगडावर झाले. अवघा १० वर्षाचा संसार आणि मग ३० ऑगस्ट १७७३ ला नारायणरावांची हत्या झाली. गंगाबाईच्या जन्माची तारीख माहिती नाही, पण मृत्युच्या वेळेस नारायणराव १८ वर्षाचे म्हणजे गंगा बाई १५-१६ वर्षाच्या असाव्यात. पती निधनाच्या दुःखाने त्यांनी प्रचंड आक्रोश केला, आपल्या थोरल्या जाऊबाई रमाबाई प्रमाणे त्यांना सती जायचे होते. पण पोटात पेशवे घराण्याचा वंश वाढत होता त्या मुळे त्यांना सती जाण्या पासुन रोखले गेले. त्याच रात्री शनिवार वाड्यातील लोकांनी ब्राह्मणाच्या मदतीनं नारायणरावावर "नडगेमोडी" वर अंत्यसंस्कार केले. (नडगेमोडी - नडगं म्हणजे गुढगा, नदीच्या पात्रात गुढग्या पर्यन्त पाणी यायची जागा, आजच्या लकडी पुलाजवळ, पोलीस चौकीच्या मागे नदी पात्रात ही जागा आहे )

ह्या दिवशी गंगाबाई पावणे दोन महिन्याच्या गर्भवती होत्या. 

नारायणरावाच्या खुना नंतर शनिवार वाडा सुतकात होता, दुसऱ्या दिवशी राघोबादादाने दरबार भरवला आणि "वैऱ्याचे कसले सुतक" म्हणुन पेशव्याच्या गादीवर जाऊन बसले. १६ वर्षाच्या या मुलीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असताना. वाड्यावर त्यांना समजुन घेणारे कोण होते ? वाडयावर दोनच स्त्रिया होत्या एक पार्वतीबाई आणि दुसऱ्या आनंदीबाई.

त्या प्रसंगी आनंदीबाईनी गंगाबाईना स्वतःच्या महालात ठेऊन घेतले. यात इतिहासकारांची दोन मते आहेत. एक मत असे की राघोबादादाला नारायणरावाचा वंश संपवायचा होता आणि त्या करता तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता आणी अशा वेळेस राघोबादादा पासुन गंगाबाईला सुखरूप फक्त आनंदीबाई ठेऊ शकत होत्या. दुसरे मत असे राघोबादादाच्या कारस्थानात आनंदीबाई सहभागी होत्या आणि त्यांनी धाकाने गंगाबाईना ठेवले होते. खरे कारण तो शनिवार वाडाच जाणो.

राघोबादादाना पेशवाईची वस्त्रं तर मिळाली. पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्यामुळे कारभारी नाराज होते. कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या. कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखारामबापु, त्र्यंबकराव पेठे, रामशास्त्री, मालोजी घोरपडे. या मंडळींनी ठरवले राघोबादादाला पेशवेपदा वरून दुर करायचे. हेच होते *बारभाई कारस्थान* राघोबाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ? ठरले गंगाबाईच्या नावाने कारभार करायचा. तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा. नाही तर दत्तक विधान करायचे. बाहेर काय चालू याची गंगाबाईना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदीबाईच्या महालात.

नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी, त्यांनी गंगाबाईना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले. त्या वेळेस पार्वतीबाई त्यांच्या बरोबर होत्या. ज्या दिवशी गंगाबाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले आणि पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे सुरु केला. पुरंदरावरच पार्वतीबाईनी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले.

पुढे जाऊन १८ एप्रिलला, सवाई माधवरावचा जन्म झाला, मुलाचं नाव माधवराव ठेवण्या मागचे कारण थोरल्या माधवरावच्या निधना नंतर पिंडाला कावळा शिवत नव्हता तेंव्हा नारायणना मुलगा झाला तर नाव माधव ठेऊ असा शब्द दिला आणि काक स्पर्श झाला. त्या नंतर ४० दिवसांनी बाल पेशव्याला पेशवाईची वस्त्रे दिली, या संपुर्ण काळात आणि पुढे पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे चालु होता.

गंगाबाई धोरणी, दक्ष होत्याच याची प्रचिती नारायणरावांची हत्या ते सवाई माधवरावाच्या जन्मा पर्यन्त च्या वागण्यातून येते. त्या धोरणी किँवा दक्ष नसत्या तर पेशव्याचा वंशज जन्माला येणे अवघड होते. त्या अतिशय समंजस होत्या, राज्य कारभाराची माहिती नसल्यामुळे त्यांनी कारभारी मंडळी वर पुर्ण विश्वास टाकला, नित्य कामे कारभाऱ्यावर सोपवली पण महत्वाचे निर्णय किँवा गुप्त खलबत्ताच्या वेळेस जातीने हजर असत. 

पेशव्यांच्या सगळ्या स्त्रियाना देवा धर्माची आवड होती ती आवड गंगाबाई मध्ये पण होती, पण इतर स्त्रिया प्रमाणे त्यांना काशी किँवा इतर तीर्थयात्रांचा योग आल्याचं दिसत नाही.

पुण्यात त्या विषमज्वराने आजारी पडल्या, वैद्य येऊन उपचार करत होते पण तब्बेतीला उतार पडत नव्हता, त्यांना शेवट जवळ आल्याचं कळुन चुकले, त्यांनी सखारामबापुना बोलावले आणि सांगितले "नानांनी आणि तुम्ही मिळोन श्रीमंतांचे आणि दौलती चे रक्षण करावे" या वेळेस सवाई माधवरावाचे वय होते अवघे तीन वर्ष. या माउलीला लेकराची आणि त्या पेक्षा दौलती ची काळजी.

पती पेशवा असताना पेशवीण म्हणुन कधी मिरवता आले नाही आणि मुलगा पेशवा होऊन पेशव्यांच्या मातोश्री म्हणुन आदराच्या स्थानी बसणे नियतीला मंजुर नव्हते. एकूण काय तर भोगले जे दुःख त्यालाच सुख म्हणायचे.

त्या काळात विधवा असुन सकेशा राहिलेली पेशवीण, नारायणरावाच्या मृत्युच्या वेळेस पोटात गर्भ असल्यामुळे शास्त्रा नुसार केशवपन झाले नव्हते.

अशी ही दुर्लक्षित पेशवीण १२ जुलै १७७७ ला विषमज्वराने मृत्यु पावली.

बिपीन कुलकर्णी 

संधर्भ - पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक)

पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे 

पेशवाईतीलस्त्रिया

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi