आजचा दिवस स्मरणीय-धनंजय मुंडे
आजचा दिवस आपल्यासाठी स्मरणीय असल्याचे सांगून सामजिक न्याय मंत्री मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांशी आपले भावनिक नाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात महामंडळाची घोषणा केली आणि टनामागे १० रुपये कारखाने आणि १० रुपये राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला. हा निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी महत्वाचा ठरेल. महामंडळाचे नाव स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याप्रती सन्मानाची भावना आणि त्यांना आदरांजली अर्पण केल्याचे ते म्हणाले.
ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार जोडणी करून त्याच मजुरांना काम द्यावे लागणार आहे. त्यामुळे मजुरांचा त्रास वाचण्यासोबत करखान्यांचाही फायदा होईल. मजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी भविष्यात महामंडळ घेणार आहे. चांगल्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी अशा संस्थाशी करार करण्याचाही प्रयत्न होणार आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना ऊसतोड कामगारांच्या विम्याची जबाबदारीही भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्यांचे श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात येईल असे ते म्हणाले.
ऊसतोड कामगार नेते डॉ. डी. एल.कराड यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. ऊसतोड कामगारांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ऊसतोड कामगार नोंदणी संकेतस्थळाचे उदघाटनदेखील करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाचे बोधचिन्ह, मार्गदर्शिकेचे व ऊसतोड कामगारांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात आला व त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री.नारनवरे यांना ऊसतोड महामंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लघुचित्रफितीच्या माध्यमातून महामंडळाच्या निर्मितीचा प्रवास मांडण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार नरेंद्र दराडे, अतुल बेनके, संजय दौंड, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment