Tuesday, 8 March 2022

 केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या

सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन.

            मुंबई, दि. 7 :- केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार' महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी असलेला आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणारा मानाचा पुरस्कार तीन महाराष्ट्रकन्यांना मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या लेकी महाराष्ट्राच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा पुढे नेत आहेत, हे या पुरस्कारातून पुन्हा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले आहे.                                  

००००००

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना

मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

            मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचे काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केले आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपले कर्तृत्वं सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचे शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील स्त्रीशक्तीचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील माता-भगिनींना, स्त्रीशक्तीला वंदन केले असून समाजनिर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच स्त्रीशक्तीचे महत्वं ओळखून त्यांना संधी देण्याचे काम केले. राज्यातील स्त्रीशक्तीनंही संधींचे सोनं करत बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिले. राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचे राज्य, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु करुन महिलांना स्त्रीशिक्षणाची दारे खुली करुन दिली. महाराणी ताराबाईंनी आपल्या शौर्यानं इतिहास घडवला, त्या इतिहासाने अनेकांना प्रेरणा दिली.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतरत्न लतादीदी त्यांच्या स्वरसामर्थ्यामुळे स्वरसम्राज्ञी ठरल्या. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्वं केले. तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी महिलांसाठी सैन्यदलांची दारे खुली केल्याने आज अनेक महिला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रानेही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्याने अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रिय झाल्या आहेत. उद्योगजगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचे योगदान महत्वाचे ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात माझ्या शासकीय गाडीचे सारथ्यं स्थानिक पोलिस दलातील तृप्तीताई मुळीक या पोलिस भगिनीनं केलं होतं. राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

०००००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi