बृहन्मुंबई घनकचरा व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींची
खातरजमा करून प्रकरणे निकाली काढली जातील
- नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि.9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन कार्यप्रणालील 1 नोव्हेंबर 2019 ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित 1426 दाव्यांपैकी 960 दाव्यांचे अधिदान करण्यात आले आहे. उर्वरित 466 दाव्यांबाबतीत काही तांत्रिक मुद्यांची खातरजमा झाल्यानंतर या दाव्यांचेही निराकरण करण्यात येईल. याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ही प्रकरणे निकाली काढली जातील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ.सुधीर तांबे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, कपील पाटील, नरेंद्र दराडे यांनी राज्यातील अनुकंपा तत्वावरील वारसांना लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
0000
तांत्रिक बाबीं तपासून हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करू
- नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि. 9 : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामपंचायत हिवरखेड यांनी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित केला. पण ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करतांना गावाची लोकसंख्या, कृषीवर आधारित नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण यासारख्या तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात. या तांत्रिक बाबी तपासून प्राथमिक घोषणा करावी लागते. यानंतर एका महिन्यात लोकांच्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जातात. त्यानंतर ग्रामविकास विभागामार्फत त्यावर कार्यवाही करण्यात येईल. अन्य बाबी तपासून एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
हिवरखेड येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment