मराठी भाषा गौरव दिनी 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन
मुंबई, दि. 25 : ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिननिमित्त मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव व त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भारत सासणे यांच्यासह श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था - लोकवाङ्मय गृह, मुंबई, अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. रमेश वरखेडे, नाशिक, मराठी अभ्यास परिषद, पूणे (संस्था) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार मिळालेली (संस्था) - मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी चौरंग निर्मित 'शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणी' हा कार्यक्रम सादर होणार आहे.
पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती
1) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – डॉ.भारत सासणे
· डॉ. भारत सासणे यांनी कथा, नाटक, एकांकिका, कादंबरी, बालसाहित्य, ललित व श्रुतिका लेखन, चित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
· डॉ.भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, सांगली येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
· डॉ.भारत सासणे यांनी ‘दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.
· सामाजिक वास्तवाच्या चित्रणात अद्भताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथात्मक साहित्याला विचारपूर्वक कलात्मक आकार दिली.
2) श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था
- लोकवाङ्मय गृह, मुंबई
o पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.
o ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रह, अशोक केळकरांचा ‘रुजुवात’ हा मराठी समिक्षेचा मानदंड, सतीश काळसेकर यांचे कसदार साहित्य, दहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित ‘निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्र, अशोक शहाणे, अरुण खोपकर, अरुण काळे, प्रतिमा जोशी, जयंत पवार, मनोहर ओक, नितिन रिंढे, अशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.
o नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कवि संमेलन, विविध लेखनविषयक स्पर्धा, आपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.
o वि.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.
o लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.
3) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)- डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक
o ‘अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समिक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.
o पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.
o का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरी, पावरा, बंजारा, अहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे ‘समाज भाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.
o 19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण, पंचायतराज, सामाजिक परिवर्तन आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.
o निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि 'क्रिटिकल इन्क्वायरी' या द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.
No comments:
Post a Comment