दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहचविण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी
मुख्यमंत्र्यांनी केले आरोग्य विभागाचे कौतुक
नावीन्यपूर्ण उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच पुढे
मुंबई, दि. 17 : जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून एका वेगळ्या उर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास व पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह आरोग्य विभागातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे
जव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झाप मधील अंतर 25 कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ 9 मिनिटात कोविशिल्ड लसीचे 300 डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले एवढेच नव्हे तर यातून लगेचच 304 नागरिकांचे लसीकरण देखील करण्यात आले. हा नावीन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने यशस्वीरितीने पूर्ण केला. यामुळे लसीची शीतसाखळी अबाधित राखणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळ आणि श्रमाची बचत होण्यास मदत झाली आहे.
ड्रोनच्या सहाय्याने झालेली लस वाहतूक हे एक पथदर्शी उदाहरण आहे, याबरोबरच भविष्यात औषध, रक्त पुरवठ्यासह अवयव प्रत्यारोपणाच्या कामालाही एक नवी दिशा मिळणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment