तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना
नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार
नगरविकास विभागाचा निर्णय
· ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन
· 1477 सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ; शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 6 : ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील 1477 सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.
विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे 1477 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
००००
No comments:
Post a Comment