दि. 6 नोव्हेंबर 2021
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी
मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक
मुंबई दि. 6 : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
००००
अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख
मुंबई दि. 6 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील अग्निकांडात झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु विभागात झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो, यासाठी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. दुर्घटनेतील जखमींना त्वरित बरे वाटावे ही प्रार्थना करतो, असे उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment