शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त
शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 29 : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर - सिंह, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात.शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
उपयोगिता लक्षात घेवूनच विमानतळाचा विकास व्हावा
केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येवू नये तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल ,पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.
नागपूर मिहान मधील ज्या विविध कंपन्यांना जागा देण्यात आली आहे त्याचाही आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला व तेथे उत्पादन योग्य रीतीने सुरू ठेवण्याबाबतही निर्देश दिले.
बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
00000
अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या
विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
9 व 10 ऑक्टोबरला होणार परीक्षा
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 29 : राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याची विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंग्यू, मलेरीया, टायफाईड इ. साथीचे आजार, वाहतुकीची कोंडी, रस्ते दुर्घटना इ. मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेच्या पहिल्या सत्रात 30 मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पूर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.
या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करिता जवळपास 27 ते 30 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन परीक्षा देवू शकले नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.
श्री.सामंत म्हणाले, वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या पात्र उमेदवारांना दि.1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन दि.9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment