दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध
कडक कारवाई करावी
- अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी
मुंबई, दि. 21 : राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळणे गरजचे आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळीसंदर्भात तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून या पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा बांद्रा येथील कार्यालयात डॉ.शिंगणे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे म्हणाले, जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांच्या वेष्टनावर तयार करण्याची आणि वापरण्यास योग्य असण्याचा दिनांक टाकणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावी.त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देशही डॉ.शिंगणे यांनी दिले.
औषध प्रशासनातर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मसिस्ट नाहीत अशा दुकानांचे परवाने रद्द करणे, आयुर्वेद, ॲलोपॅथी व इतर औषध निर्मितीचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि विभागातील पदभरती इत्यादि विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनने केलेल्या कामाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त श्री. सिंग यांनी दिली. या कालावधीत दूध या अन्न पदार्थाच्या संदर्भात कारवाईत रुपये 4,60791 किमतीचा माल जप्त करण्यात आला. दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत रुपये 39,50,386 किमतीचा माल जप्त करण्यात आला. तर जप्तीत 526.10 लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या मोहिमेत खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तुप, रवा मैदा, बेसन मसाले अशा भेसळ युक्त वस्तुंचा रुपये 31,11,514 किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
No comments:
Post a Comment