मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारताच्या लोकसंख्येचा आणि तरुण पिढीच्या नाविन्यतेचा फायदा देशाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताला मोठ्या भौगोलिक आणि लोकसंख्येचा फायदा मिळाला आहे. देशाची जवळपास ६५% लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून हा वयोगट आपली खरी ताकद आहे. या वयोगटातील नाविण्यतेचा 'मानवी संसाधनात' रूपांतर करणे हे आपले मुख्य ध्येय आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याची अर्थव्यवस्था सध्या ६६० अब्ज डॉलर्सची असून, ती लवकरच १ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औद्योगिक परिसंस्थेला सर्व स्तरांवर उत्तम कौशल्यांची गरज आहे. यासाठी हा आंतरराष्ट्रीय कौशल्य करार महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती देणारा ठरेल. हा करार केवळ कागदावर न राहता त्याचे लवकरच प्रत्यक्ष कृतीत रूपांतर केले जाईल. या ऐतिहासिक सहकार्यामुळे उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळेल आणि भारतीय तरुणांसाठी जागतिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.