Sunday, 31 May 2026

वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड खपवून घेतली जाणार नाही

 वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या;

गुणवत्तेबाबत तडजोड खपवून घेतली जाणार नाही

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २५ : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बांधकामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. अलिबाग, नंदुरबार, वाशिम, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामांची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच कामातील अडचणींबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. कामांना गती देत दर्जेदार वैद्यकीय सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले .

मंत्रालयात आयोजित बैठकीत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार आणि संबंधित अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अनेक प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एडीबी), जायका यांसारख्या संस्थांकडून अर्थसहाय्य मिळत असून, कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हाधिकारी , महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले ,सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये, निधी वितरण आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी तसेच स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात.

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; संघटनांनी पुढाकार घ्यावा १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही

 अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; संघटनांनी पुढाकार घ्यावा

१५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई, दि. २५ : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या उपक्रमात रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत राज्यातील विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी मराठी भाषा शिक्षण उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री सरनाईक म्हणाले की, चालकांना व्यवहारिक मराठी आत्मसात करता यावी यासाठी दररोज चार तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठी संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षण अधिक प्रभावी आणि सुलभ व्हावे यासाठी विविध शाखा कार्यालयांमध्ये विशेष वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांत प्रारंभी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही मराठी शिकविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना मानधन दिले जाणार आहे. शासनाकडून यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.

 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची मौखिक परीक्षा घेण्यात येणार असून यशस्वी उमेदवारांना शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय हिंदी ते मराठी भाषांतर आणि सोपे मराठी संभाषण शिकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऑनलाइन ॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून चालकांना मराठी शब्द, वाक्यरचना आणि दैनंदिन संवाद सहज शिकता येणार असून मराठी भाषेचा वापर अधिक सुलभ होणार आहे. या उपक्रमामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होईल तसेच मराठी भाषेचा प्रसार आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात इंधनाचा मुबलक साठा भीतीपोटी काही जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

 राज्यात इंधनाचा मुबलक साठा

भीतीपोटी काही जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

- मंत्री छगन भुजबळ

 

मुंबई, दि. २५ : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे; तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, तेल कंपन्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करावी. राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवावी. काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधनटंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि तेल कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून अतिरिक्त साठेबाजी रोखावी.

राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के; तर डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. अकोला येथे पेट्रोल विक्रीत ४४ टक्के, बुलढाणा येथे ४७ टक्के, जालना येथे ४९ टक्के; तर वर्धा येथे ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, बैठकीत एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धता व वितरण व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा

  

·         जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना

वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापरासाठी प्रस्ताव सादर करा

- मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि.२५ : राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध होतील. विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करून प्रभावी धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मंत्रालयामध्ये जहाज पुर्नावापरासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी आणि श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपीचे प्रतिनिधीं उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, राज्यातील वापरात नसलेल्या बोटी व जहाजांच्या पुनर्वापर प्रक्रियेला गती देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी यांनी  राज्यातील वापरात नसलेल्या बोटी व जहाजांचा पुनर्वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा. विशेषतः इनलँड व्हेसल तसेच मोठ्या जहाजांसाठी एक खिडकी प्रणाली विकसित करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. यामुळे जहाज पुनर्वापर प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि वेग वाढण्यास मदत होईल.

 या विषयावर विभागामार्फत सखोल अभ्यास करण्यात येईल व तो आगामी बोर्ड बैठकीत मांडण्यात येईल. तसेच स्क्रॅपमध्ये काढावयाच्या बोटींची शॉर्टलिस्ट तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सागरी क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना मिळण्यासोबतच जहाज पुनर्वापर उद्योगाला नवी दिशा मिळणार असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

00000

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी अमरसन्स

 यावेळी मंत्री राणे म्हणाले, मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी अमरसन्स गार्डन इंटरचेंज परिसरात तसेच वरळी डेअरी परिसरात तात्पुरत्या जेट्टी उभारण्यात आल्या होत्या. आता हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना या जेट्टींचा उपयोग जलवाहतूक, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, वॉटर अॅम्ब्युलन्स आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी करण्याचा विचार आहे.

 

यासंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आयआयटी, मुंबई कडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, अहवालानुसार अमरसन्स जेट्टी प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, वरळी डेअरी परिसरातील जेट्टीमध्ये आवश्यक संरचनात्मक बदल केल्यानंतर ती जलवाहतूक आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवांसाठी वापरता येऊ शकते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

या प्रकल्पासाठी प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट, डीपीआर, पर्यावरणीय परवानग्या आणि अन्य तांत्रिक मंजुरींसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निविदाकाराची निवडही अंतिम टप्प्यात आहे.दरम्यान, वरळी जेट्टीवर हेलिपॅड विकसित करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर इच्छुक संस्थांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमागविण्यात आले आहेत.

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती ; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर

 वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती ;

जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर

- मंत्री नितेश राणे

·         मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

 

मुंबई, दि. 25 : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

 

मंत्रालयात आयोजित बैठकीत वरळी जेट्टीच्या विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त

31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. 26: शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त ‘त्रिवेणी’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 31 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारी जीवनकार्याला, राष्ट्रनिष्ठ विचारांना आणि सामाजिक योगदानाला सांस्कृतिक अभिवादन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदन या कलामाध्यमांच्या त्रिवेणी संगमातून सावरकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि राष्ट्रभक्ती प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणारे विशेष सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.  

सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथा दर्शविणारा हा नाट्य, नृत्य आणि निवेदनात्मक भव्य प्रयोग देशभक्ती, स्त्रीशक्ती आणि एकत्र कुटुंब व्यवस्थेच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी मिलाप ठरणार आहे; तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील कौटुंबिक आणि भावनिक पैलूंनाही या कार्यक्रमात विशेष स्थान देण्यात आले आहे. यशोदा सावरकर, यमुना सावरकर आणि शांताबाई सावरकर यांच्या भूमिकांमधून सावरकर कुटुंबाने राष्ट्रासाठी दिलेले योगदान, त्याग, संघर्ष आणि समर्पण यांचे भावस्पर्शी दर्शन घडविण्यात येणार आहे. राष्ट्रकार्यासाठी झटणाऱ्या सावरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या महिलांचे योगदान संगीत, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारण्यात येणार आहे.

यशोदा सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून कुटुंबातील संयम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठ मूल्यांचे दर्शन घडविण्यात येणार असून, यमुना सावरकर यांच्या भूमिकेतून कठीण परिस्थितीतही सावरकरांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि धैर्य अधोरेखित करण्यात येणार आहे. शांताबाई सावरकर यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचे योगदान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी बाजू रसिकांसमोर मांडण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन केले असून, संकल्पना व दिग्दर्शन राजश्री पोहेकर यांचे आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागर करताना नव्या पिढीपर्यंत राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे.

मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, कलाकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्रिवेणी’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व ठरणार असल्याची भावना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी व्यक्त केली आहे.

Featured post

Lakshvedhi