सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 19 February 2025
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 18 :- "छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.
उपमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
000
कोकणातील साहित्यिक वाटचालs
कोकणातील साहित्यिक वाटचाल
२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख..
महाराष्ट्राच्या इतर विभागाप्रमाणेच एक विभाग म्हणजे कोकण. या कोकणात वेधक निसर्गसौंदर्य, भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभलेला समुद्रकिनारा, विविध झाडे - झुडुपे, डोंगर - दऱ्या अशा अनेक नयनरम्य नैसर्गिक साधनसंपत्ती आढळतात. त्यामुळे इतर विभागाप्रमाणेच कोकणचे वेगळे महत्व आहे. त्यासोबतच कोकण हा महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेला प्रदेश आहे. त्याचे कारण म्हणजे याच कोकणात अनेक चळवळींचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्या त्या चळवळींचा मोठा प्रभाव हा कोकणासह महाराष्ट्रात झाला. त्यामुळे कोकणातल्या सर्वच क्षेत्राची वाटचाल अत्यंत लक्षणीय आहे. एवढंच नाही नव्हे तर, इतर चळवळीप्रमाणेच इथल्या साहित्यिक चळवळीचा इतिहास मोठा आहे आणि त्याला विविध साहित्यप्रकारांची आणि प्रसिद्ध साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही कालही प्रभावी होती, आजही लक्षणीय आहे आणि भविष्यातदेखील तिचे योगदान मोठे असणार आहे.
कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण
कोकणात नमन, जाखडी, लोककथा, ओव्या आणि भारुडे मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती आणि कालानुरूप आजही त्यांचे अस्तित्व भक्कम आहे. दशावतारी नाट्यप्रकारही इथल्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या साहित्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रथा - परंपरा - सण - उत्सव यांचे महत्व अधोरेखित झाले. आजही ग्रामीण भागात वरील प्रकारातुन साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यतः लोककथा, ओवी, भारुडे, कविता, कथा, कादंबरी आणि नाटकांमधून व्यक्त झाली आहे. म्हणूनच कोकण हा केवळ निसर्गरम्य प्रदेश नसून, तो मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा भाग आहे. कोकणातील साहित्यिक वाटचाल लोकपरंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्प्यांतून गेली आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. लोकसाहित्य, कविता, कथा आणि नाट्य या सर्व माध्यमांतून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले, ज्यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले. कृ. आ. केळुस्कर यांनी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र आपल्या स्वखर्चातून लिहिले आणि त्यातून साहित्य चळवळ प्रवाहित केली. कवी केशवसुत यांना मराठी आधुनिक मराठी कवितेचे मानले जाते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अनिष्ट प्रथा यावर कवी केशवसुत यांनी प्रहार करताना मानवतेचा आणि सामाजिक जाणिवा वृंद्धीगत करणारा आशय मांडला. त्यापुढील धनंजय कीर यांच्यासारख्या चरित्र लेखकांनी भारतातील अनेक नामवंत आणि महनीय व्यक्तिमत्वाची चरित्रे निर्माण केली. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी, महेश एलकुंचवार यांसारखे कादंबरीकार, लेखक आणि नाटककारही कोकणातील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ समृद्ध झाली. जयवंत दळवी आणि इतरांनी नाट्यलेखन आणि विविध क्षेत्रात लेखन करताना त्या - त्या लेखनाचा आशय समाजमनाला भावणारा ठेवला. त्यामुळे संवेदनशील असणारे कोकणी समाजमन या लेखनाकडे आकर्षित झाले. परिणामी कोकणात साहित्यिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.
कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी
अशा असंख्य लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वसमावेशक कोकणी मनाला भुरळ घातली. प्रत्येकाच्या लेखणीच्या आशयसंपन्न लेखनामुळे लहान ते ज्येष्ठ यांच्यापर्यंत साहित्याची आवड निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणजे कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी झाले. रत्नागिरी येथे १९९० मध्ये झालेले साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत कोकणातील वाडी - वस्त्यांमधील संवेदना जपणाऱ्या मनांनी लिहायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे अनेक कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखन करणारे साहित्यिक तयार झाले. त्यातून त्यांच्याच पुढाकाराने कोकणात विविध साहित्य संमेलने भरवली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोकणात झाली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७ पेक्षा जास्त केंद्रीय संमेलने, साहित्य विश्वात पहिल्यांदाच सहा राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन यासह स्थानिक स्तरावर अनेक संमेलने झाली. त्यात राजापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे, नाट्य संमेलनाचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. त्यात कोकणी भाषा आणि साहित्य चळवळ यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली जाते. महिला साहित्य संमेलन असो वा युवा साहित्य संमेलनातून महिला आणि युवा वर्गाच्या समोर असणाऱ्या प्रश्नांना आवाज असतो. त्यामुळे या साहित्य संमेलनात उपस्थितीदेखील मोठी असते.
काळाच्या ओघात कोकणातील असंख्य नवलेखक आपल्या सृजनशील लेखणीच्या द्वारे आता कादंबरी, कविता, लघुकथा, चित्रवाहिन्यावरील मालिकांचे लेखन, संहिता लेखन आणि चित्रपट कथा या माध्यमांतून योगदान देत आहेत. कोकणावर आधारित पर्यटन, विज्ञान, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथा लोकप्रिय होत आहेत. जुन्या आणि नवीन लेखकांनी कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मागील किती तरी वर्षांपासून सुरू असलेली साहित्यिक आणि मराठी भाषिकांची मागणी विद्यमान सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वच मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यात कोकणचे मोठे योगदान असेल. यावर्षी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
थोडक्यात अनेक थोर लेखकांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत ज्या अपेक्षेने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ उभारली त्याच जोमाने ती पुढे - पुढे जात आहे. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेऊन भडकत्या प्रसारमाध्यमांच्या काळात तरुण मनाला लिहिते करत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल ही आव्हानात्मक जरी असली तरी समाधानकारक आहे.
000
श्री. माधव विश्वनाथ अंकलगे
तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा
तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना देण्यासाठी नियमावली यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) व टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.
राज्यात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 व FCTC (Framwork convention on Tobaco control) article ५.३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित विभाग व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये सहायक पोलिस महानिरिक्षक राजतिलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. टोबॅको कंट्रोल, साऊथ एशीया, वाइटल स्टृटॅजी डॉ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजना? तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक विभागाची असल्याचे सांगितले.
डॉ.अर्जुन सिंग यांनी लहान वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी महाराष्ट्रात ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, याबाबत सविस्तर माहिती दिली. कायदेशीर तरतुदीनुसार तंबाखू क्षेत्रातील उद्योग आरोग्य संस्था व त्यांच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून कळवावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.
तंबाखू नियंत्रणावरील FCTC article 5.3 च्या मार्गदर्शक सूचना अधोरेखित करण्यात आल्या. या धोरणानुसार किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करते. विशेषत: तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.
कार्यशाळेसाठी आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, हेलीस सेक्शेरीया इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक, डॉ.प्रकाश गुप्ता टोबॅको कंट्रोल, साऊथ इस्ट, एशिया, वाइटल स्टृटॅजीस संचालक, डॉ.राणा जे.सिंग यांच्यासह टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, Tobacco control, vital strategies चे तांत्रिक सल्लागार डॉ.शिवम कपुर, oral public health department चे उपसंचालक डॉ.उमेश शिरोडकर, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डॉ..राहुल सोनवणे, NTCP चे कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डे, अध्यक्ष मनसुख झांबड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले, डॉ.निकिता गायकवाड यांनी सूत्र संचालन केले व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार मानले.
त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू
त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू
- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
· पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;
· बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट
मुंबई, दि. १८ - महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणी प्रभावीपणे राबवू, असे पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.
आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन मंत्री पर्यावरण श्रीमती पंकजा मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.
त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी, पीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत, २००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.
त्रिपुरा बांबू हस्तकला उत्कृष्ट डिझाइन, विस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा करण्यात येईल, असे सांगितले.
श्रीमती मुंडे यांचे आगरतळा विमानतळावर शासकीय वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.
बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार
बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार
- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १८ : रिपब्लिक ऑफ बेलारुस सोबत सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीसाठी राजशिष्टाचार विभागामार्फत पुढाकार घेण्यात येऊन सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पादन, प्रक्रिया उद्योग यामध्ये बेलारुसच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
बेलारुसचे महावाणिज्यदूत अलेक्झांडर मात्सुकोऊ यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील परस्पर संबंध वृद्धीबाबत चर्चा करण्यात आली. वाणिज्यदूत कान्स्टान्सिन पिंचुक यावेळी उपस्थित होते.
राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. महाराष्ट्रात उत्तम समुद्र किनाऱ्यांसह विविध प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. राज्यात मुबलक कृषी उत्पादन होत असून उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत यामुळे आंबा, डाळींब, केळी आदी फळे, भाजीपाला विविध देशात निर्यात केला जातो. बेलारुसच्या उद्योजकांनी राज्यातील शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, त्यांना निर्यातक्षम कृषीमाल उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे सांगून द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून परस्पर सहकार्याच्या क्षेत्रांची निश्चिती करुन देवाण-घेवाण वाढीवर भर देता येईल, असे त्यांनी नमूद केले.
श्री.मात्सुकोऊ यांनी श्री.रावल यांच्यासमवेत आश्वासक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. बेलारुस मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ तर महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी उत्कृष्ट असल्याने परस्पर पर्यटनवृद्धीसाठी वर्षभर संधी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिनेसृष्टी जगप्रसिद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
0000
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत
- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांमधील संशोधन, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील शेतकरी आणि उद्योजकांनी भागीदारीसाठी महाराष्ट्रात यावे, येथे त्यांचे स्वागत होईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
ब्रिटीश उप उच्चायुक्तालयातील द्विपक्षीय व्यवहार प्रमुख जॉन निकेल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबरोबरच गुंतवणूक वाढविण्याबाबत चर्चा झाली.
राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, राज्यातील समृद्धी महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग जोडले गेले आहेत. सर्व विभागांमध्ये स्थानिक गरजांनुसार उद्योगवाढीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील आंबा, डाळींब, केळी अशा फळांना मोठे निर्यातमूल्य आहे. फलोत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी देखील येथे वाव आहे. इंग्लंडमधील शेतकऱ्यांनी राज्यातील शेतीला भेट द्यावी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन करुन तंत्रज्ञानासह महाराष्ट्रात भागीदारी तसेच गुंतवणुकीसाठी आपले स्वागत होईल, असेही त्यांनी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
