Friday, 2 February 2024

पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना

 पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना

                                                            - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबईदि. २ : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावामहिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई  हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी  नवी  कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री  गिरीश महाजन यांनी केले आहे.

            पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेले व्यवसाय असल्यास संबंधित उद्योजिका महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, पर्यटन व्यवसायामध्ये  ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरिता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याज परतावा देण्यात येईल.  या योजनेसाठी व्याजाची  रक्कम १२% च्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधी पर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावे; या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येईल.

      राज्यातील महिला पर्यटक  उद्योजिकांनी  अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अथवा  मुख्यालय – ०२२ ६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोकण  ९१ ९६०४३ २८०००पुणे  ९१ ९४२३७ ७५५०४ नाशिक साठी ९१ ९६८९९०८१११ छत्रपती संभाजी नगर ९१ ८९९९० ९७२५५नागपूर आणि अमरावती  ९१ ८४२२८ २२०५८ / +९१ ९२२६७७९७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पर्यटन संचालनालयपर्यटन विभागयांच्याकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेसाठी २१६.६७ लाख रुपये निधी वितरित

 राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत

परंपरागत कृषी विकास योजनेसाठी

२१६.६७ लाख रुपये निधी वितरित

 

            मुंबई दि. २ : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत  परंपरागत कृषी विकास योजना सन 2023- 24 या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता केंद्र सरकारचा हिस्सा  130  लाख रुपये व त्या अनुसरून राज्य सरकारचा हिस्स्याचा 86.67 लाख रुपये असा एकूण २१६.६७ लाख रुपये इतका निधी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

               सन 2016 -17 पासून राज्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना, ही गट शेती आधारित सेंद्रिय शेती योजना, केंद्राचा हिस्सा 60 टक्के व राज्याचा हिस्सा 40 टक्के या प्रमाणात राज्यात राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक सेंद्रिय शेतीस व सेंद्रिय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणेसहभाग हमी पद्धतीने प्रमाणिकरण करणेशेतकऱ्यांच्या शेतावार सेंद्रिय निविष्ठा तयार करणेरासायनिक किटकनाशके उर्वरित अंशमुक्त शेतमाल ग्राहकास उपलब्ध करून देणेसेंद्रिय शेती ग्राम विकसित करणे तसेच शेतीवर आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेणेकमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढविणे याबाबीचा योजनेत समावेश आहे.

            ही योजना गट आधारित असून 20 हेक्टर क्षेत्राचा एक गट याप्रमाणे गट स्थापन करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत एकदा निवड केलेल्या गट/लाभार्थीस तीन वर्षे लाभ देण्यात येतो. सन 2022- 23 पासून परंपरागत कृषी विकास योजनेकरीता राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

0000

दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान

 दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना

स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान

 

            मुंबईदि. 2 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योगकामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण आज प्रदान करण्यात आले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघलउपसचिव स्वप्नील कापडणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवारदादासाहेब खताळदीपक पोकळेअवर सचिव बाबासाहेब शिंदेकक्ष अधिकारी राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत

 विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी

परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत

राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

 

            मुंबईदि. २ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नयेनोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेतअसे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

            राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल्यउद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढामुख्य सचिव डॉ. नितीन करीरउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीराज्यपाल यांचे सचिव श्वेता सिंघलविशेष सचिव श्री. सक्सेनाउच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्करतंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर अवर सचिव विकास कुलकर्णी यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरूसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की,  महाविद्यालयांनी एकत्रित येऊन  क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावा. तसेच विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे. प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे.

            उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. एनआयआरएफ (NIRF) रैंकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयेविद्यापीठाचा समावेश वाढविण्यासाठी प्रयत्न करावेअशी अपेक्षाही यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

            यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्त पारंपरिक खेळांना प्रोत्साहन द्यावे. महाविद्यालय हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. प्रत्येक कुलगुरूंनी ग्रामीण भागातील दहा गावे दत्तक घेऊन  त्यांचा सामाजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले कीजर्मनीला विविध क्षेत्रात चार लाख कुशलप्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबत महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार होणार असून जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे. तिथे किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या किंवा संबंधित कंपनीकडून निवड न झाल्यास त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य असणार आहे. तसेच सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नियोजित केल्याने यावर्षी एकाही प्रवेश परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागला नाहीत्याच धर्तीवर विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करावेत. आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेचआर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक  वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतीलयासाठी विशेष अभियान राबवावेअशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

            कौशल्य विकास मंत्री श्री लोढा म्हणाले की,  विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी सर्व महाविद्यालयात कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

            मुख्य सचिव डॉ. करीर यांनी सांगितले कीराज्यातील सर्व खाजगी आणि शासकीय विद्यापीठात विविध प्रशिक्षण आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध भाषा आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. खाजगी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही कोणत्याही शासकीयनिमशासकीय कार्यालयात इंटर्नशिप करण्याची मुभा द्यावी. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्याचा निर्णय घेतला आहेतो वेळेत देण्यात यावा. विद्यापीठांना प्राप्त होणाऱ्या संलग्न शुल्कावरील जीएसटी माफ करण्यासाठी पुढच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मुद्दा मांडण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) विद्यार्थ्यांच्या क्षमता बांधणीसाठी योग्य धोरण राबवावे. शिवाय विद्यापीठाच्या प्रत्येक शिक्षकांनी आठवड्यातून अर्धा तास तरी एनईपीबाबत ऑनलाईन माहिती घेण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन मुख्य सचिव डॉ. करीर यांनी केले.

            उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी सादरीकरण केले. मागील संयुक्त मंडळाच्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसी आणि सूचनांवरील प्रगती आणि अंमलबजावणी अहवालशैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट: अंमलबजावणीच्या स्थितीचा तपशील  आणि कार्यअहवालनवीन क्रेडिट अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विद्यापीठाने विकसित केलेल्या आयकेएस (IKS) कोर्सेसची सद्यस्थितीनवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून मराठी भाषेतील  अनुवादित पुस्तकांचा आढावा घेतला.

            महा-स्वयंमऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मनवीन क्रेडिट अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि  स्थिती व स्वायत्त महाविद्यालयासमोरील अडचणीई-समर्थ प्लॅटफॉर्म अंमलबजावणीराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीसाठी अहवालउच्च तंत्र शिक्षण विभागाकडून राज्य शासनाच्या विविध विभागात इंटर्नशिप धोरण आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येणार आहे. त्याची अंमलबजावणी करणेतसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संस्थात्मक इंटर्नशिप धोरण आणि विभागांसाठी इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी करणेराज्यातील विद्यापीठांसाठी एकत्रित समान शैक्षणिक वेळापत्रक ठेवणेशैक्षणिक वर्षात फक्त एकदाच दीक्षांत समारंभ आयोजित करणे‘युजीसी’च्या नियमांनुसार नवीन शैक्षणिक धोरण  अंमलबजावणीसाठी कॉलेज ॲम्बेसेडरची नियुक्ती करणेविद्यापीठस्तरावर सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणीविद्यार्थी तक्रार निवारण मंच स्थापन करणेमहाविद्यालयीन स्तरावर महिला निवारण मंचाची स्थापनाप्रत्येक विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे बळकटीकरणछत्रपती शिवाजी महाराज चरित्रावरील अभ्यास शिबिरांचे आयोजन करणे अशा महत्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर चर्चेद्वारे सादरीकरण करण्यात आले.

            विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र डिजीलॉकर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पदवी प्रमाणपत्र  वापरता येईल. अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

            दरम्यान सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.

000

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामरोजगार सेवक होणार आता ग्रामरोजगार सहायक

ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

            मुंबईदि. १ : ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करुन ते ग्रामरोजगार सहायक असे करण्यात येईलअसे जाहीर करतानाच मानधनात वाढ करण्यासाठी अन्य राज्यात यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडरोजगार हमी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवलेरोहयो मिशन महासंचालक नंदकुमार यांच्यासह ग्राम रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख आणि नोंदवह्या आदी कामांसाठी ग्रामसेवकांना मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. राज्यात २६ हजार ६०० ग्रामरोजगार सेवक ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असून त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन दिले जाते. सध्या मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यासाठी अन्य राज्यात या ग्रामरोजगार सेवकांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांची माहिती घेऊन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            ग्रामरोजगार सेवकांना सध्या विमा कवच नसल्याने अपघात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे हाल होतातही बाब लक्षात आल्यावर ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्रामरोजगार सेवकांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

०००००


श्री गणेशोत्सव

 


पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे

 पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे

राज्यभरात लहान बंधाऱ्यांसाठी स्थळ निश्चिती करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून मान्यता

            मुंबईदि. १ : राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावीअसे निर्देश देतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यामुळे महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर उपाययोजना करणे शक्य होईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांबाबत बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडनियोजन विभागाचे प्रधान सचिव डॉ. रामास्वामीमृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील महाबळेश्वरजावळी तालुक्यातील गावांना फेब्रुवारी ते मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यावर उपाय म्हणून कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. जलसंधारण विभागाने सर्वेक्षणाच्या आधारे २५ ठिकाणी बुडीत बंधारे बांधण्यासाठी अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. या बंधाऱ्यांसाठी सुमारे १८५ कोटी खर्च येणार आहे.

            या प्रस्तावित बंधाऱ्यांची गावे कोयना जलायशाच्या शेवटच्या भागात असून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या बुडीत बंधाऱ्यांची मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या २५ बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.

            पाण्यासंदर्भातील छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे. लहान स्त्रोतांचा विकास करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी राज्यभरातील जागांची निश्चिती करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोकणातही अशा लहान बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावेअसेही त्यांनी सांगितले.

0000


Featured post

Lakshvedhi