Thursday, 28 September 2023

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती;2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त

 आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती;2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त


 


            मुंबई, दि. 27 : सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करून भरती करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत प्रयत्नरत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. तसेच याबाबत विभागाने कंपनी प्रतिनिधीसोबत नियतकालिक आढावा बैठक घेऊन भरती प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया गतीने पुढे सरकत आहे.


                आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ मधील भरतीसाठी 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले आहेत. गट ‘क’मधील एकूण 55 संवर्गातील 6 हजार 949 रिक्त पदे असून ‘ड’ गटातील 4 हजार 10 रिक्त पदे आहेत. अशाप्रकारे एकूण 10 हजार 949 पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात प्रसिद्धीस दिली. या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट ‘क’ मधील रिक्त पदांसाठी 1 लाख 42 हजार 206 आणि ‘ड’ गटातील रिक्त पदांकरीता 11 हजार 649 अर्जांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे 8 परिमंडळ क्षेत्रात विभागलेली आहेत. गट ‘क’चे नियुक्ती प्राधिकारी उपसंचालक, आरोग्य सेवा आहेत.


               आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी विभागाने 28 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2023 होती. भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आता संपला असून लवकरच पुढील कार्यवाही होणार आहे. भरतीमुळे आरोग्य विभागातील विविध रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होणार आहे. नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे काम लवकरात लवकर केले जाणार आहे. या भरतीमुळे आरोग्य यंत्रणा निश्चितच अधिक बळकट होणार आहे.

दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता

 दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता


- कृषी मंत्री धनंजय मुंडे


 


            मुंबई, दि. 27 : दिवेआगार ता.श्रीवर्धन, जि. रायगड येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी 5 कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


            मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.मुंडे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, दिवेआगार येथे 5 एकर जागेत सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास त्वरीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पाच कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ला, ता.रोहा येथील काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा आराखडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी सादर करावा. तसेच विद्यापीठाला गिरणे, ता. तळा येथे दिलेल्या जागेत उभारण्याच्या खारभूमी संशोधन केंद्राचा आराखडा तयार करुन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.


            हे आराखडे तयार करताना कोकणातील नारळ, सुपारी, आंबा या फळपिकांसोबतच विविध प्रकारच्या मसाला पिकांचाही संशोधनात समावेश करावा, तसेच श्रीवर्धन रोठा सुपारीला जीआय मानांकन मिळविण्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

 राज्यात १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार


 


             मुंबई, दि. २७ : राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे.


      राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषदांमार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिनानिमित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र / परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात "जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस" (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तळाशी जाताजाता, आधी अंगावर लादलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

 तळाशी जाताजाता,

आधी अंगावर लादलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

मग अपेक्षांचा अबीरबुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर,

अलंकारांचं ओझं हलकं करायचं,

कालांतराने 

स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे ..

इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका,

दैवत्वाची झालर ,

सोडून द्यायची,


आणि त्याच मातीचा भाग व्हायचं 

जिथून आपण आलो होतो.


पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्या साठी .


बाप्पा जाताजाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो .


बरंच काही शिकवून जातो.

तुझे येणे, तुझे जाणे ? आणि आमचे उगा मिरवणे....

 तुझे येणे, तुझे जाणे ?

आणि आमचे उगा मिरवणे....


अनादी,अनंत तो एक !

त्याला काय कोण बनवेल 

अन् बुडवेल ?


अनंत पिढ्या आल्या...

अनंत पिढ्या गेल्या....

तो तरीही उरला...



रोजच क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा....

हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा...

असा तो रोजंच का 

न पुजावा ?....


रोज नव्याने मनी तो

असा जागवावा....

अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा..

🙏🙏🙏🙏🙏

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापककेशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापककेशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत


 


            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. केशव सांगळे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये व्हीजेटीआय मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने प्रा. सांगळे यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 2, मंगळवार दि. 3, आणि बुधवार दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


०००

सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

 सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत

पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

 

            नवी दिल्लीदि.27 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.

            नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते  देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवारमहात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशीपाटगावचे सरपंच विलास देसाईमधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.

            शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिकनैसर्गिकआर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी 5 गावांना सुवर्ण10 गावांना रौप्य तर 20 गावांना कांस्य पदक मिळाले आहे.

            युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशनयुनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमजी -20केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.

                 सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मध विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सूक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्डखादी व ग्रामोद्योग विभागमहसूलग्रामविकासपर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. नाबार्डच्या सहकार्यातून पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मध उत्पादकविक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे. 

            पाटगावच्या मधाचे ब्रँडींगपॅकेजिंगलेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणेमधपाळांना मधपेट्या देणेआवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडावअंतुर्लीमठगाव,  तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

            या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्थास्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्यामधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

0 0 0 0 0

Featured post

Lakshvedhi