Tuesday, 15 August 2023

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

 विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

            मुंबई, दि.१४ : देशाच्या फाळणीचा इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या आठवणींचे आणि इतिहासाचे चित्रण एका छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. काळा घोडा येथील इंडियन बँकच्या हेरिटेज इमारतीमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


            "आपल्या देशाच्या विभाजनाचा इतिहास हा किती वेदनादायक होता, त्याचा आपल्या लोकांवर काय परिणाम झाला, देशासाठी किती लोक शहीद झाले या सर्व गोष्टींची माहिती नवीन पिढीला व्हावी. म्हणून हे प्रदर्शन महत्वाचे आहे. विभाजनानंतर दहशतवादी हल्ले या सारख्या अनेक समस्यांशी आपण झुंजतो आहोत.” असे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट पर्यंत खुले राहील.       


            इतिहासाच्या माहितीप्रमाणेच तरुणांचा कौशल्य विकास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, त्या उद्देशाने युवा पिढीसाठी स्वातंत्र्य दिनाची भेट म्हणून शासकीय औद्येगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन होणार असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले. येत्या ३ महिन्यांत राज्यातील सर्वच आयटीआय व्हर्चुअल क्लासरूम बनवू आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करू, असे देखील त्यांनी सांगितले.


            इंडियन बँकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी एसएसपी रॉय, फील्ड जनरल मॅनेजर, मुंबई, स्वातंत्र्यसैनिक गुणवंती जोशी उपस्थित होत्या.


००००

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

 वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

            मुंबई, दि. ११ : राज्यात वैद्यकशास्त्रात समतोल विकास साधणे आणि वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरूपता आणण्यासाठी विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.


            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमार्फत शैक्षणिक सेवा तसेच रुग्ण सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना तसेच विविध उपक्रम शासनस्तरावर राबविण्यात येत आहेत. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्यभरात विविध शिबीरे आयोजित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर नव्याने वैद्यकीय महाविद्यालय आणि बी.एस्सी. नर्सिग हा अभ्यासक्रम सुरू करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करूण देणे, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्तपदांबाबत भरतीचा निर्णय घेणे असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ ' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 17 ऑगस्ट, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


०००

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 14 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


            गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.


            निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


०००


श्रद्धा मेश्रा

म, स.सं



 


सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठीघरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार

 सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठीघरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत


            मुंबई, दि.१४ :- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.


            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मंगेश कुडाळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष संजय जयस्वाल, समितीचे अध्यक्ष जॉनी जोसेफ उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आता एका घरासाठी ३० अर्ज आहेत. ते प्रमाण एकास ५ पर्यंत आणण्यासाठी ‘म्हाडा’ सारख्या शासनाच्या संस्थांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांचे स्वप्न, हक्काचा निवारा साकार होण्यास मदत होईल.


            ‘म्हाडा’वरील लोकांचा विश्वास वाढतोय. यामुळेच या सोडतीसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले.हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी पारदर्शकपणे काढण्यात येत आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला आहे.


            ‘म्हाडा’च्या या सोडतीमुळे मुंबईकर पुन्हा मुंबईत येवू शकणार आहेत. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास ते करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. धारावी सारखा प्रकल्प सुरू होत आहे. देशातील सर्वात मोठा ट्रान्स-हार्बर समुद्रावरील रस्ता एक वर्षात सुरू होत आहे. प्रवाशी मुंबईतून २० मिनिटांत रायगड जिल्ह्यात जावू शकणार आहे. कोस्टल रोड, मेट्रो यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे १.५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पंढरपूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ‘म्हाडा’ला मोफत जमीन मिळते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासनाचेही हेच स्वप्न आहे, की सर्व सामान्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन ‘म्हाडा ’च्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील आणि पुढील सोडतीमधील घरांच्या किमती इतर घरांपेक्षा कमी असतील.


            ‘म्हाडा’ने अधिकाधिक घरे निर्माण करावीत. मुंबईतील नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करावीत. नवी मुंबईत अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत.


            सर्वसामान्य जनतेला त्यांच्या उमेदीच्या काळात घराचे स्वप्न साकार झाले. तर त्याचा मोठा आनंद संबंधितांच्या परिवारास होतो. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. म्हाडा पारदर्शकपणे सोडत काढून जनतेचा विश्वास जिंकत आहे. म्हाडा पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवनवीन योजना राबवीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले की, घरांची मागणी वाढत आहे. लवकरच पुढील सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांना पुढच्या लॉटरीत कागदपत्रांची पडताळणीची आवश्यकता असणार नाही. गृहनिर्माण प्रकल्पांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


मुंबई ‘म्हाडा’च्या सोडतीविषयी अधिक माहिती


            म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली..


            सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे.


         ही सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.         


          सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवारनगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (४१६) या योजनेकरिता आहेत तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नतनगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.  


0000



 


दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 14: राज्यात सध्या डोळे येणे या आजाराची साथ सुरू आहे. डोळे येऊ नये म्हणून तसेच डोळे आल्यावर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्षा रोकडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.16, गुरूवार दि. 17 आणि शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी असलेल्या

महाराष्ट्राच्या पोलिसांचा राज्याला अभिमान


-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदक विजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


            भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 954 पोलिस पदकांची घोषणा केली. राज्यातील 76 पोलिसांना ही पदके जाहीर झाली आहेत. उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, महाराष्ट्र पोलिसांना शौर्याची, त्यागाची, देशसेवेची, बलिदानाची प्रदीर्घ, गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्र पोलिसांची देशसेवेची ही गौरवशाली परंपरा पुढे नेणाऱ्या राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 33 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'पोलीस शौर्यपदक', तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राला अभिमान असून यापुढील काळातही त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.


0000

महाराष्ट्रातील 17 तुरुंग कर्मचाऱ्यांनासुधारात्मक सेवा पदक जाहीर

 महाराष्ट्रातील 17 तुरुंग कर्मचाऱ्यांनासुधारात्मक सेवा पदक जाहीर


            नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी :-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक


1. श्री. सुनील निवृत्ती धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1


2. श्री. प्रकाश बाबुराव उकरंडे, जेलर ग्रुप 1


3. श्री. तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रुप 1


4. श्री. आनंद शंकर हिरवे, सुभेदार


5. श्री. गणेश पांडुरंग घोडके, हवालदार


 


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक


1. श्री. अनिल हणमंत खामकर, अधीक्षक वर्ग 1


2. श्री. वामन तुकाराम निमजे, जेलर गट 1


3. श्री. विजय ज्ञानेश्वर कांबळे, जेलर ग्रुप 1


4. श्री. तानाजी कृष्ण धोत्रे, जेलर ग्रुप 2


5. श्री. किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार


6. श्री. विजय लाडकू पाटील, सुभेदार


7. श्री. प्रकाश महादेव सातपुते, सुभेदार


8. श्री. चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार


9. श्री.बाबासाहेब हनुमंत चोरगे, हवालदार


10. श्री. दत्तात्रय किसन भोसले, हवालदार


11. श्री. अशोक कुंडलिक आडाळे, शिपाई


12. श्री. सुधाकर रामकृष्ण माळवे, शिपाई


००००




 


Featured post

Lakshvedhi