Wednesday, 14 June 2023

वारीच्या निमित्ताने


दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत

 अन् दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदतअवघ्या काही मिनिटांत मिळाला पाच लाखांचा धनादेश


            मुंबई, दि. १४ : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला...मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...


            मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. त्यांना प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री श्री. शिंदे मंत्रालय सोडत नाही. सामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबवितानाच त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमीच आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात.


            आज दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या...लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.


            बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला. त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला. शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी 

दिल्या.


०००००


अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी

 अडाण व अरूणावती प्रकल्पाच्यासुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करावी


         -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड


 


            मुंबई , दि. 14 : “अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. त्यासाठी दोन टप्प्यांत कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी”, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.


                अडाण प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीअंतर्गत कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे काम त्वरित सुरू करणे व अरूणावती प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. बैठकीला जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. फुंदे, श्रीमती नमिता बशेर, यवतमाळचे अधीक्षक अभियंता श्री. राजभोज आदी अधिकारी उपस्थित होते.


              बेंबळा प्रकल्पाच्या धर्तीवर अडाण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. राठोड म्हणाले, “मुख्य वितरिका, उप वितरिका, तसेच अन्य 'स्ट्रक्चरल' कामे पूर्ण करावी. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात व अंदाजपत्रक तयार करताना कुठलीही बाब सुटता कामा नये. वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्यावे”, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.


0000

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत.


            मुंबई, दि. 14 :- मुंबई येथे दि. 15 ते 17 जून 2023 या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयावर उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 15 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे-


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००


 




आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी’ उपक्रम


आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी  आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी’ उपक्रम


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. 14 : “आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.


            पंढरपूरकडे येणाऱ्या दिंडीमध्ये दिंडीच्या सुरूवातीलाच एक हजार आरोग्य किटचे वाटप केले असल्याचे सांगत मंत्री श्री. सावंत म्हणाले, “दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दिंडीसोबत प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक असणार आहे. यामध्ये आरोग्यदूत वारकऱ्यांसोबत असतील. या पथकांची संख्या 127 आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत 24 तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथके कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. तसेच औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत 3 रूग्णवाहिका पथके, तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत 4 रूग्णवाहिका पथके असणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 75 शासकीय रूग्णवाहिका पालखीसोबत कार्यरत असणार आहेत.”


            मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले, “पालखी मार्गावर सर्व 1921 हॉटेलमधील कामगार व पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालखी मुक्कामाचे ठिकाणी तीन दिवसांपूर्वी व एक दिवस आधी धूरफवारणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेमार्फत जैवकचरा विल्हेवाटीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य संदेश देणारे तीन चित्ररथ, तीन पथनाट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदाच एवढ्या सूक्ष्म नियोजन पद्धतीने आरोग्याच्या वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालखीसोबत 30 बाईक ॲम्बुलन्सही असणार आहे.”


पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन


            आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व 65 एकर तिन रस्ता याठिकाणी आयोजित केले जाणार आहे. या शिबिरास राज्यातून खाजगी व सरकारी असे एकत्रितपणे 9 हजार डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी मोफत आरोग्य सेवा पुरविणार आहे. वारकऱ्यांची सुरूवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून 5 लक्ष चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मोतिबिंदू असणाऱ्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. पालखी तळावर जाऊन सर्व वारकऱ्यांना प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मार्फत मोफत तपासणी व औषधे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.


            यासोबतच मंत्री श्री. सावंत विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना म्हणाले, “राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात आले. या अभियानातून 2 कोटी 39 लाख माता भगिनींची तपासणी करण्यात आली. आजारांचे निदान झालेल्या 52 हजार महिलांवर उपचार करण्यात आले. तसेच ‘जागरूक पालक – सुदृढ बालक’ अभियानही राबविण्यात आले. यामध्ये वयानुसार तीन टप्प्यात बालकांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण 0 ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन यांची तपासणी करण्यात आली. भविष्यात 18 वर्षावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. उपकेंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान यापुढे राबविले जाणार आहे.”


 

जनसेवा जिवन धिधले, बलसागर भारत होवो

 वर एक फोटो शेयर केला असून,ओडिशाच्या बालासोर मधील रेल्वे अपघातानंतर तुटलेल्या ओवरहेड वायर फिटिंगचं काम करण्यास खुद्द रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव वर चढले अन उपस्थित रेल्वे विभागाचे इंजिनिअर व कर्मचारी आवाक झाले,इंजिनिअर व कर्मचारी कसं काम करत आहेत हे पाहताना लागणारा वेळ व टेक्निकल त्रुटी लक्ष्यात आल्यानंतर स्वतः काम हातात घेतलं तेंव्हा उपस्थित अचंबित झाले होते, बाकी विरोधकांप्रमाणे तुम्ही ही म्हणाल हे फक्त फोटोसेशन होतं,तर तुमचा अंदाज साफ चूक आहे,कारण... रेल्वे मंत्री वअश्विनी वैष्णव हे जोधपुरच्या रीजनल इंजीनियरिंग कॉलेज मधून 1980 साली इंजीनियरिंग विभागातुन टॉपर आहेत,अन त्यांनी इंजिनिअरिंग सुद्धा इलेक्ट्रिकल्स मधून केलं आहे,इंजिनिअरिंग नंतर त्यांनी आईआईटी कानपुर मधून एमटेक करत पुन्हा टॉपर होते,इथे ही त्यांनी इलेक्ट्रिकल सब्जेक्ट घेतला होता. त्यानंतर त्यांनी रेल्वे निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एलस्ट्रोम मध्ये काही वर्ष नौकरी केली आहे, खाजगी नौकरीनंतर त्यांनी सिविल सर्विस परीक्षा दिली व देशातून बारावी रँक मिळवत त्यांनी जिल्हाधिकारी पासून प्रधानमंत्र्याचे प्रमुख सचिव पर्यंत मजल मारली. त्यानंतर नौकरी मधून VRS घेऊन जनरल इलेक्ट्रिक या कंपनीत एमडी या पदावर कार्यरत झाले,काही वर्षांनंतर तिथून बाहेर पडत पावर इंस्ट्रूमेंटेशन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सीमेंस मध्ये डायरेक्टर या पदावर कार्य केलं,अन मग या सर्व क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन थेट केंद्रात मंत्रिपद मिळाले,आज ही त्याच उर्मीने व जिद्दीने काम सुरू आहे. अश्या हिऱ्यांना पंतप्रधान मोदींनी जनतेच्या सेवेसाठी मदतीला घेतले आहे.🤷🏼‍♂️



राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार

 राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार


                                               - पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


            गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.


थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम


            भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.कार्ला - आचार्य चाणक्य म्युझियमसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती, अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म नीती व याचसोबत ७ दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरिता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे निवास व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब


            नव्या पिढीला पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे.प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचे जतन करावे, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


अंगणवाडीत योग दिवस साजरा होणार


            महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृद्धींगत व्हावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.


0000



संध्या गरवारे/विसंअ


Featured post

Lakshvedhi