Tuesday, 6 June 2023

लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय*

 *लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय*


*बाळाला उचकी लागणे :*


एक वर्षाच्या 🧒🏻 आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता 😱 करण्याचे कारण नसते.


दूध पिल्यानंतर 🍼बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज नसते. 


*बाळाची उचकी थांबवण्यासाठी हे करा उपाय :*



▪️बाळाला स्तनपान केल्यानंतर 20 मिनिटे ⏱️ उभ्या स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.


▪️दूध पाजल्यावर बाळाची ढेकर जरूर 😮‍💨काढावी.


▪️ एकाचवेळी भरपूर दूध पाजण्यापेक्षा बाळाला वरचेवर थोडे थोडे दूध पाजत 🍼 राहावे.


*अशी काळजी घेतल्यास बाळाला उचकी लागण्यापासून थांबवता येते.*


( *संकलन:* आर्या देव) 


रोगांच्या खात्रीशीर निदान व उपचार यांसाठी वैद्य तुषार साखरे (आयुर्वेदाचार्य) यांना जरूर संपर्क करा.


💁🏻‍♀️ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.* 🤗


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण

 जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण


पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 5 : विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील नागपूर, मुंबई, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून सन 2024 पर्यंत 5 हजार कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात 18 नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत. नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.


            पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते 'माझी वसुंधरा ३.०' पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वीत्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयर, आबासाहेब जऱ्हाड, विजय नाहटा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण महत्वाचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. देशात पर्यावरणीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे आगळे - वेगळे स्थान आहे. निसर्ग सौंदर्यानी नटलेले आपले राज्य असून हा अनमोल ठेवा आपल्याला जतन करावयाचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. देशात पर्यावरणीय दृष्टीने राज्याचे महत्व आगळे - वेगळे असून निसर्गाचे वरदान आपल्याला लाभले आहे. पश्चिम घाट, समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांग हा आपला अनमोल ठेवा असून त्याचे जतन ही काळाची आणि समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


            प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास महत्त्वाचा असून आर्थिक विकास करताना निसर्गाचे संवर्धन व समतोल राखून प्रकल्प आपण करतो आहोत. पर्यावरण पूरक विकास हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा अविभाज्य अंग आपण मानले आहे. राज्यात सौरऊर्जा, जल, पवन ऊर्जा या क्षेत्रात सरकारने तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया तसेच पवन ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, माझी वसुंधरा 3.0 च्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्या या सकारात्मक कामगिरीमुळे आज 174 कोटी रुपयांचे बक्षीस या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांचा पुढाकार निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. पंचमहाभूतांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करून माझी वसुंधरा अभियान 3.0 आपण राबविले. या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली, ही कौतुकास्पद बाब आहे. 16 हजार 714 नवीन हरित क्षेत्र राज्यात तयार केली आहेत.


            जागतिक स्तरावर वातावरणीय बदलाची चर्चा सुरू आहे दावोस मध्ये झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेवेळीही हाच चर्चेचा विषय होता. तापमान वाढ, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ, जैव प्रजाती नष्ट होण्याच्या घटनेत वाढ, अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबतच्या समस्या असे धोके निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन आपण काम करत आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पर्यावरण पूरक समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा 33 लाख झाडे आपण लावणार आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            या कार्यक्रमावेळी ‘माझी वसुंधरा 4.0’ च्या लोगोचे अनावरण, नोंदणीसाठी पोर्टलचे अनावरण, युनिसेफच्या पुस्तिकेचे प्रकाशन, विज्ञानधारा मासिकाचे प्रकाशन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, महसूल मंत्री श्री. विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            या वेळी सेंटर फॉर वॉटर सॅनिटेशन यासह विविध सामंजस्य करार करण्यात आले.


माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध संस्थांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे (१० लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.


            अमृत शहरे (३-१० लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपा, अहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


अमृत शहरे (१-३ लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिका, बार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत (५० हजार ते १ लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत (२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लज, मोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या) गटात दहिवडी, मालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पाचगणी, पन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.


ग्रामपंचायत ( १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर), गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर) आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( ५ ते १० हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे), धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( २.५ ते ५ हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर), जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक), सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.


            भूमी थीमॅटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, गडहिंग्लज नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, पांचगणी नगरपरिषद, सोनई ग्रामपंचायत, बोराडी ग्रामपंचायत, वाघोली ग्रामपंचायत, शिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.


            यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे), राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली), आशिष येरेकर (अहमदनगर) आणि श्रीमती आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. दराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.    


00000


दीपक चव्हाण/विसंअ/

केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

 केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन


 


            मुंबई, दि. 5 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. 15 जून 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  


००००

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान

 तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान


- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे


एलजीबीटीआयक्यू अभिमान पदयात्रेत प्रथमच शासकीय यंत्रणेचा सहभाग


 


            मुंबई, दि. 5 : पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायातील व्यक्तींचा मतदार यादीत समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग वचनबद्ध असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. आपला समाज एलजीबीटीआयक्यू समुदायाला समजून घेत आपलेसे करेल,तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान, असे मतही श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.


            एलजीबीटीआयक्यू समुदायाच्या 'अभिमान महिन्या'निमित्त पुण्यातील 'युतक' या संस्थेच्या वतीने आणि द हमसफर ट्रस्ट, द ललित, केशवसुरी फाउंडेशन व बिंदू क्विअर् राइट्स फाऊंडेशन यांच्या मदतीने 4 जून रोजी पुण्यात 11 वी एलजीबीटीआयक्यू समुदायाची अभिमान पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.


            राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, पुणे हेही या पदयात्रेत सहभागी झाले होते. या अभिमान पदयात्रेमध्ये २००० लोक सहभागी झाले होते. तसेच सारथी ट्रस्ट नागपूर, अजिंक्य सातारा, नाशिक एलजीबीटीआयक्यू, नगर क्वीयर, पुणेरी प्राइड फाऊंडेशन, पुणे, पालकांचा 'सपोर्ट ग्रुप स्वीकार' मुंबई देखील यात सहभागी झालेला होता. याशिवाय या चळवळीला समर्थन देणाऱ्या अनेक संस्था मासूम, कनेक्टिक, विदुला सायकोलॉजी कन्सल्टन्सी, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, 8 पेक्षा अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी या अभिमान यात्रेमध्ये सहभाग घेतला.


            महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे या पदयात्रेसाठी ग्रॅण्ड मार्शल म्हणून चालले. देशात प्रथमच एक सरकारी कार्यालय अशा प्रकारच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. पारलिंगी व्यक्तींना मतदानाचा हक्क मिळावा आणि त्याचबरोबर मतदान कार्ड मिळावे यासाठी श्री. देशपांडे यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. कोणताही दस्तऐवजाशिवाय सहज पद्धतीने मतदान कार्ड मिळावे यासाठी यांनी दोन दिवसांचे शिबिर आयोजित केलेले होते. निवडणूक अधिकारी यांच्यासोबत पोलिस भरतीसाठी पात्र ठरलेल्या दोन पारलिंगी व्यक्तींनी सहभाग घेतला.


              ‘लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि आदर’ ही या अभिमान पदयात्रेची संकल्पना होती. त्या निमित्ताने पारलिंगी व्यक्तींची मतदार नोंदणी, आणि त्यांच्या लोकशाहीतील समावेशनाविषयी समाजात जाणीव-जागृती करण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रथमच या अभिमान पदयात्रेत सहभाग घेतला होता.


****

प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच

 प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 5 : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी करू या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            ‘भामला फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन राज्य शासन काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान आदी समस्या जगाला भेडसावत आहेत. या समस्येवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन हाच उपाय आहे. प्रदूषण निर्मूलनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास प्रदूषण निर्मूलन चळवळीस बळ प्राप्त होईल. प्रदूषण निर्मूलनासाठी ‘भामला फाऊंडेशन’ या संस्थेचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा

 आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारभ

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


• क्लस्टर योजनेतून पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे मिळणार


• 1500 हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्यात राबविणार योजना


            ठाणे, दि. 5 (जिमाका) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 1997 मध्ये ठाण्यातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृत धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. आज कित्येक वर्षानंतर या योजनेचे काम सुरू होत आहे. ही योजना मार्गी लागण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. ठाण्यातील या क्लस्टर योजनेचे काम आता सुरू झाले असून इमारती पूर्ण होईपर्यंत ते काम सुरू राहिल. या योजनेत नुसतेच इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील. एक सुनियोजित शहर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जा पेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील. अधिकृत इमारती व सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना या क्लस्टर योजनेत समावेश हा ऐच्छिक ठेवला असून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीचे ताबा पत्रे देण्यात आली तर महाप्रितचे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका आयुक्त श्री. बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


             अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ - 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे हस्ते झाले.



0000


पक्षाघात आजार माहिती (Paralysis)*

 *पक्षाघात आजार माहिती (Paralysis)* 


मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.


पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.


*पक्षाघाताचे प्रकार :* 

पक्षाघाताचे दोन प्रमुख प्रकार असतात.


*1) Ischemic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.


*2) ‎Hemorrhagic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.


 *3) Transient Ischemic Attack-* म्हणजे TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल.


*पक्षाघाताची लक्षणे :* 

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.

◼️ एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

◼️ हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

◼️ ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

◼️ अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

◼️ ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

◼️ ‎चक्कर येणे, तोल जाणे,

◼️ चेतना कमी होणे

◼️ तीव्र डोकेदूखी

ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.


*लक्षात ठेवा ‘FAST’* 


पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..

*F – Face (Facial Weakness) :* रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*A – Arms (Arm Weakness) :* रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

*S – Speech Difficulty) :* रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*T – Time (Time to Act) :*

कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते


वरील लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.


वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी नॅचरल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण (Brain Circulation) सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल.

तसेच पक्षाघात हेऊच नये म्हणून नियमितपणे हायड्रोजनयुक्त पाणी पित राहणे उत्तम.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi