Tuesday, 2 May 2023

खऱ्याची दुनिया* राहिली नाही.

 तुम्हाला म्हणून सांगतो! *खऱ्याची दुनिया* राहिली नाही. त्यात बहुतेक सर्व जाहिराती या फसव्याच असतात. त्याचं झालं असं की, दोन महिने झालं माझ्याकडे असलेला पांढरा शुभ्र शर्ट मी स्वतःच (चोरून) धूतोय. कारण बायकोकडे जर दिला तर ती आकाश-पाताळ एक करेल .

*'एकाच धुलाईत डाग गायब' असा दावा करणाऱ्या दोन तीन नामांकित कंपन्याचे डिटर्जंट, साबण वापरले. पण काही केल्या शर्टवरचा लिपस्टिक चा डाग जाता जाईना.*


 आता बोला कसा विश्वास ठेवायचा .... ---------------👄 😜

Monday, 1 May 2023

राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न


सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया


                                                              -राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन



            मुंबई, दि. 1 : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. 


            छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निसार तांबोळी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


            राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचा त्यांनी उल्लेख केला.


            राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.


            राज्य शासन करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप आणि इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.  


            राज्यपाल म्हणाले, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.50 लाख रूपयांवरुन पाच लाख रूपये करण्यात आली आहे. याशिवाय नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. 45 विविध उद्योग आणि उद्योग समूह यांच्यासमवेत करार करुन एक लाख 25 हजार रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान 500 युवकांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनरेगा मध्ये 36.32 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी शासनाने विकासाची पंचसूत्री ठरविली आहे. जी-20 परिषदेच्या बैठका महाराष्ट्रातही होत असून यात सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे कौतुक केले आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यान 521 किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस खुला झाला असून आतापर्यंत या महामार्गाचा 10 लाखांहून अधिक वाहनांनी वापर केला आहे. 


            नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे सांगून राज्यपालांनी सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा आता मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत केंद्राप्रमाणेच राज्यशासनही प्रती शेतकरी सहा हजार रुपये देणार असल्याने दरवर्षी 12 हजार रूपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमाहप्त्याची दोन टक्के रक्कम आता शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ सुमारे 14 लाखांहून शेतकऱ्यांना मिळत आहे.


            शासनामार्फत प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले असून पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांसाठी पाच लाख रूपयांची विमाछत्राची योजना राबविण्यात येणार आहे. एक कोटी 63 लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे फक्त 100 रुपये इतक्या माफक दराने वितरण केले आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रोख 75 हजार रूपये देण्यात येणार आहेत. महिलांना बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. महिलांना घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास तसेच 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यासह अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचे राज्यपाल म्हणाले. 


            दिव्यांगांचे संरक्षण, पुनर्वसन, रोजगार आणि स्वयंरोजगार याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. आता सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रूपये दिले जाणार आहेत. नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे रेती धोरण तयार करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. अमरावतीच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक साहाय्याच्या रकमेतही 15 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. 



            मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक), बृहन्मुंबई अग्निशमन दल वाहने (आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर) यांनी सहभाग घेतला. 



नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र


            राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये तुषार संभाजी गवारी, गौरव उत्तम शिंदे, आशिष विठ्ठल दराडे, श्रीमती हेमिती विजय सावंत, श्रीमती वैशाली विजय यादव आणि श्रीमती आरती सदानंद तांदळे, श्रीमती पूजा दत्तात्रय दाभाडे, राहुल सत्यवान शिंदे, योगेश अशोक चव्हाण, प्रणव मोठाभाऊ भामरे यांचा समावेश होता.


चित्ररथ स्पर्धेचे निकाल जाहीर


            प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सोहळ्यात एकूण 16 चित्ररथांचे सादरीकरण झाले होते. यामधून कृषी विभागाच्या चित्ररथाने प्रथम, सांस्कृतिक कार्य विभागाने द्वितीय तर गृह विभागाच्या (वाहतूक) चित्ररथाने तृतीय क्रमांक मिळवल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.


            कार्यक्रमाचे संयोजन राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव मिलिंद ह

रदास, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर,


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेमहिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेमहिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ




              मुंबई,दि.1: शिवराज्यभिषेक सोहळा 350 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने 350 दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


              राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग नमस्ते फॉउंडेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन संचालक‍ बी.एन.पाटील उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते दादरच्या सावरकर स्मारक पर्यंत ही रॅली आज सकाळी काढण्यात आली.                   

देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज

 देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

             मुंबईदि. 1 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

              छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्यसुंदर समुद्र किनाराव्याघ्र प्रकल्पजैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्रसह्याद्री पर्वत रांगासातपुडालोणार सरोवरकळसूबाई शिखरसंदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

             आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहलीआमची मुंबई मध्ये तीन सहलीहेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहलीमेस्मरायजिंग कोकण दहा सहलीकल्चरल पुणे सात सहलीस्पिरीचुअल नाशिक चार सहलीमिस्टीकल अमरावती दोन सहलीवाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवासउपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.

000

             मुंबई, दि. 1 : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टुर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


              छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.


             आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टुर पॅकेज सुरु केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबई मध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगर आठ सहली, मेस्मरायजिंग कोकण दहा सहली, कल्चरल पुणे सात सहली, स्पिरीचुअल नाशिक चार सहली, मिस्टीकल अमरावती दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भ पाच सहली अशा या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टुर पॅकेजसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टुर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.


000

मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात

 मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात


                                                            - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे


प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरणयासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना


सी साईड प्लाझा आणि लेझर शो देखील आयोजित होणार


            मुंबई दि.1 : देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.


            मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज (दिनांक 1 मे 2023) केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. 


            या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


            मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा करून महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विविध सूचना केल्या.


            महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण 53 मीटर लांब व 5 मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.


            मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त श्री. चहल यांनी नमूद केले.


            दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा यांनी दिली.

एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

 आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवातबसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदरएसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प

                                                            - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.  


            यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.


स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा


            एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.


            एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी


            आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.


 


आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


            प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.


            यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.


            यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी ... एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.


            या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू

 राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू


आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय


                                                     - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा


 


            मुंबई, दि. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.


            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, याचे समाधान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला, कष्टकरी-कामगार आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाणीवपूर्क प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातूनही पंचामृत संकल्पनेतून सर्व सामन्यांच्या हितांच्या गोष्टींना, विकासाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरु होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात. अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत. सामान्य माणसांला आरोग्य सेवा, उपचाराचा बोजा उचलावा लागू नये अशी ही तरतूद आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महिला, शेतकरी यांच्या करिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची तसेच गरींबाकरिता घरे विशेषतः ओबीसींसाठी घर निर्मिती, रोजगार निर्मितीवर भर याबाबतही माहिती दिली.


            आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल.


            सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून आपला दवाखाना योजनेच्या विस्ताराचे अनावरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी आभार मानले.                                   


000


                                              

                            


Featured post

Lakshvedhi