Saturday, 22 April 2023

 ठाणे-पालघर जिल्ह्यासाठीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल


                                                  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि.22 :-ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या 900 खाटांच्या नुतन इमारत बांधकामाच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.


            यावेळी केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, रमेश पाटील, संजय केळकर, रविंद्र फाटक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, सा.बां. प्रा. विभाग कोकणचे मुख्य अभियंता शरद राजभोज, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन व रीमोटव्दारे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एक वेगळे नाते जोडले गेले होते. दिघे साहेबांच्या काळात जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणांहून आलेल्या रुग्णाबद्दल दिघे साहेबांना माहिती मिळताच, आलेल्या प्रत्येक रुग्णाची दिघे साहेब स्वत: प्रत्यक्ष येऊन विचारपूस करत असत. त्यांना काही अडचणी असल्या तर ते त्याचवेळी त्या अडचणींचे निरासन करत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करणे, अत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. कोराना काळात या रुग्णालयाने महत्वाची भुमिका बजावली आहे. या रुग्णालयामुळे कोरोना महामारीत लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.


             सर्व अडचणींवर मात करुन अत्याधुनिक सेवासुविधा असलेले रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विहित मुदतीच्या आत दर्जेदार इमारत तयार करुन देण्याच्या सुचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.


            पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असे सांगून सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्यानंतर जनतेने रुग्णालयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ९०० खाटांच्या अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण होण्याआधीच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यास रुग्णालय संपूर्ण ताकदीने सुरु होईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबी आतापासूनच पूर्ण कराव्या, अशा सुचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.


            सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, 18 महिन्यात पूर्ण होणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाचे मी स्वत: माझ्या स्तरावर मॉनिटरिंग करणार आहे. या बांधकामाचा प्रत्येक महिन्याचा आढावा मी घेणार आहे. हे रुग्णालय भारतात प्रथम क्रमांकचे रुग्णालय होईल. मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात आरोग्याच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी आणि सर्दी खोकल्या सारख्या आजारांचा लगेच उपचार करावा, अशा सुचनाही डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी दिल्या.


            सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील चित्रफीतीव्दारे नवीन इमारतीची माहिती देण्यात आली.


            यावेळी कडक उन्हात राहून वाहतुक व्यवस्था सांभळणाऱ्या पोलीसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आभार मानले.


अशी असेल नवीन इमारत; या असतील सुविधा


            नवीन बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ 6 लाख 81 हजार 397.40 स्वे.फुट आहे. मुख्य इमारत (Block-A) यामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय बेसमेंट 2 + बेसमेंट 1 + तळ मजला + 10 मजले एअर रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यात एक परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारत आहे. ही इमारत 10 मजली असून यामध्ये बैठक कक्ष, 300 प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण वर्ग, तळमजल्यावर भोजनकक्ष इ. सुविधाउपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर वसतीगृहाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळ, तळ मजला + 6 मजले क्षमतेचा असून इमारतीच्या छतावर सौरउर्जातंत्र बसविण्यात येणार आहे. रुग्णालयाची नवीन इमारत (Block-A) व नर्सिंग प्रशिक्षण केंद्र ( Block-B) या दोन्ही इमारतींना सातव्या मजल्यावर पूलाव्दारे जोडण्यात आले आहे. इमारतीमध्ये 14 उद्वाहन, 11 आधुनिक आय.सी.यु. (एकूण 117 खाटा), 15 ओ.टी., इ. सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात सौर उर्जेद्वारे निर्माण केलेल्या वीजेचा वापर करण्यात येणार आहे. 200 खाटांच्या सुपरस्पेशालीटी विभागामध्ये कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, ऑनकॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या प्रमाणे अत्याधुनिक साधनसामुग्रीसह सुविधा उपलब्ध होणार आहेत. 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेरियाटीक वॉर्ड, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड, इएनटीसह, ऑर्थोपेडीक वॉर्ड, ट्रामा केअर युनिट, इन्टेन्सिव्ह केअर युनिट, आयसोलेशन वॉर्ड, बर्न वॉर्ड, आय वॉर्ड व शस्त्रक्रियागृह, टीबी आणि चेस्ट वॉर्ड, एसएनसीयु वॉर्ड, एनआरसी वॉर्ड, सायकॅट्रिक वॉर्ड, प्रिंझनर वॉर्ड, हिमॅटॉलॉजी वॉर्ड याप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


            200 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये प्रसुतीपूर्व/प्रसुतीपश्चात/प्रसुती कक्ष तसेच इक्लॅम्पशिया कक्ष, तसेच प्रसुती वॉर्ड व बालरुग्ण वॉर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा रुग्णालयात ब्रेन, हार्ट, किडनी सर्जरी, अत्याधुनिक डायलिसीस, कार्डियाक न्युक्लिअर मेडिसीन, रेडिओथेरपी, केमोथेरपी, अत्याधुनिक प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मातामृत्यु दर कमी करण्यासाठी आधुनिक आय.सी.यु. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यु. उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अद्ययावत एमआरआय, सी.टी. स्कॅन, एक्स-रे, लॅब सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पीएसए प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन प्लांट, जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सेंट्रल लाईन इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा वापर भविष्यात करण्यात येईल. ठाणे जिल्हा रुग्णालय हे ठाणे जिल्हयातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय असून लगतचे पालघर व रायगड जिल्हयातील रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. याठिकाणी सुपरस्पेशालीटी रुग्णालय झाल्यास ठाणे, पालघर, रायगड येथील गोर, गरीब, गरजू, आदिवासी रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई येथे स्थलांतरीत करावे

 लागणार नाही.


0000


पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी

 पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी


१५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन


 


               मुंबई, दि.२२ : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.


            पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.


            एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.


            या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

चाकी गाडीने प्रवास करताना अनेकांना उलटी का होते? मळमळ थांबवण्यासाठी काय करावे.....?*

 *चार चाकी गाडीने प्रवास करताना अनेकांना उलटी का होते? मळमळ थांबवण्यासाठी काय करावे.....?*


How To Reduce Motion Sickness: हे गाडी लागणे म्हणजे नेमकं काय आणि असं कशामुळे होतं? यावर उपाय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.


*कारने प्रवास करताना उलटी का होते? उपाय काय...?*

उन्हाळयाच्या दिवसांमध्ये कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? आपल्यापैकी अनेकांना प्रवासात उलटी होण्याचा त्रास असतो. तुम्हीच सांगा तुम्ही कुठल्याही पिकनिकमध्ये भले मग तुम्ही कारने जात असो किंवा बसने एक तरी असा माणूस असतो ज्याला मळमळीचा त्रास होतोच. अनेकांना चार चाकी गाडी लागते असं म्हणतात. पण हे गाडी लागणे म्हणजे नेमकं काय आणि असं कशामुळे होतं? यावर उपाय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.


डॉ बीपी त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासामध्ये विशेषतः चार चाकी गाडीने प्रवास करताना अनेकांना उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर व मळमळ जाणवू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे मोशन सिकनेस. जेव्हा तुम्ही प्रवासाच्या वेळी खिडकीतून बाहेर बघता तेव्हा एकाच वेळी कान, डोळे, व त्वचा तुमच्या मेंदूला विविध संकेत देत असते. यामुळेच नर्व्हस सिस्टीममध्ये संभ्रम निर्माण होण्याचा धोका असतो.


इतकंच नाही तर तुम्ही प्रवासात काही वाचत असाल किंवा मोबाईल पाहात असाल तरी मेंदू व अवयवांचा ताळमेळ बिघडू शकतो.


*प्रवासात उलटी येत असल्यास काय उपाय करावे...?*

तुम्हाला सतत मळमळ होत असेल तर आलेपाक, आवळा सुपारी किंवा पेपरमिंट माऊथ फ्रेशनर तुमचा त्रास कमी करू शकते. त्यामुळे विशेषतः लांबच्या प्रवासात आवर्जून या गोष्टी जवळ बाळगा.


प्रवासाआधी लवंग भाजूस वाटून घ्या व यात किंचित सैंधव मीठ घालून चूर्ण करा. हे मिश्रण मळमळ थांबवण्यात नामी उपाय ठरू शकते.

रिकाम्या पोटी प्रवास करणे टाळा. तुम्हाला जड काही खायचे नसल्यास तुम्ही फळे सुद्धा खाऊ शकता. रिकामे पोट असल्यास त्यात आम्ल वाढू शकते.


लिंबू, कोल्ड्रिंक, आले किंवा पुदिन्याचे सेवन करू शकता.

मागच्या सीटवर बसणे टाळा.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कृपया अक्षतृतियाचा शुभेच्छा स्वीकार करावा

 *आज अक्षय तृतीया आहे सर्वांना आंबे 🥭🥭 पाठवत आहे..... लाभ घ्यावा....*


दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

 *दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*


*दमा म्हणजे काय ?*


दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास

घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय

असा आवाज योतो.


*अस्थमाची लक्षणे -*


◼️खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.

खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ

खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.


◼️दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.


*दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा* *अटॅक येणे म्हणजे काय..?* 


दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास 

धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील

प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो 


*दमा होण्याची कारणे -*


शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक 

निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.


◼️ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक

येतो.


◼️धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र

वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात

आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,

सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,

शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.


◼️वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,


◼️मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.


*दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :* 


◼️अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी

करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,

◼️दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,

◼️मानसिक ताणतनाव रहित रहावे,

धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,

◼️दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,

◼️पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

◼️प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,

◼️ थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

◼️डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.


Friday, 21 April 2023

सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई दि. 21 : सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


            सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलीना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या - 01) या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे शिक्षण - दहावी उत्तीर्ण असाव. एम एस सी आय टी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा - 30 ते ५० असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.


            अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, ७९३३३५, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल zswo_mumbaiupnagar@maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी.


०००


 

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू

 लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू


          - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. २१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १६७२ तक्रारी आज दाखल झाल्या असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने महिलांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


        परेल येथील मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्ड येथे आयेाजित ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे जी दक्षिण वॉर्ड चे संतोष धोंडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले, ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात १६७२ तक्रारी दाखल झाल्या असून आज प्रत्यक्ष हजर असलेल्या १६२ अर्जदार महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जावे यासाठी कार्यवाहीचे आदेश लगेचच सर्व यंत्रणांना दिले आहेत. स्थानिक प्रशासनाने पुढील तीन महिन्याच्या कालावधीत उर्वरित १५१० तक्रारी निपटारा करण्याचे आदेश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी दक्षिण वॉर्ड येथे बँका, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            सी वॉर्ड येथे २५ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.


०००

Featured post

Lakshvedhi