Tuesday, 14 February 2023

मुलगीही हुंडी मागते.

 *हुंडा फक्त मुलगाच मागतो का...?*

*जरा विचार करून बघा.......*

*सर्वप्रथम अनामिक लेखकाचे मनापासून आभार.* 🙏🏻🙏🏻🌹🌹


*समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त.*


*मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली.*

*“समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…”*

*“हं. जाऊ चल. आलोच.” समीर आवरुन हॉलमध्ये आला. आई तिथेच होती. “चला आईसाहेब” असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली.*


*गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आईला विचारले,*

*“तू भेटली आहेस का त्यांना या आधी ?”*

*“हो रे.. एकदा भेट झाली आहे आमची..”*

*“माझ्या अटींबद्दल सांगितले का..”*

*“हो… ते तयार आहेत. अगदी तुझ्या मनासारखंच होईल.”*


*आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला. ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले.*

*मुलीच्या वडिलांनी समीर आणि आईचे स्वागत केले.*

*घरी बाकी साऱ्याची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले,*


*“आर्या ला बोलवा .”*

*“हो..”*

*आर्यच्या आई हसतमुखाने म्हणाल्या.*

*थोड्या वेळाने आर्या आली.* *शिडशिडीत, सावळी, सुंदर आर्या. उंच, गोऱ्या समीरला शोभेल अशी.*


*समीरला आर्या पाहताक्षणी आवडली. तिने समीरच्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली.*

*काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला.*


*नंतर आर्याच्या वडिलांनी तिला व समीरला पाठवले.* 

*समीर व आर्या गच्चीत आले होते. दोन-चार शब्दाची देवाण-घेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला,* 

*“तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर…”*


*“हो.. ते माहिती आहे की मला…"*


*“कसं काय ?”*


*“म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या… म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला.”*


*“अस्स… बर…"*


*"तसं तर मी आईलाही आताच नेणार होतो पण ऐकत नाहीत आईसाहेब..." यावर आर्या म्हणाली, “म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला ?”*


*“हो.. अर्थात…”*


*समीरच्या या उत्तरावर आर्याच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.*


*“काय झालं ?”*


*“काही नाही…”*


*“सांगा.. बिनधास्त. मनात शंका ठेवून राहू नका.”*


*“खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात, कारण पुण्या-मुंबईसारखं मनमोकळं इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते. पण, आता तुमच्या आई येणार म्हणजे…”*


*तिला मध्येच तोडत समीर म्हणाला,*


*“मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे, चला जाऊ या.”*


*“पण…”*


*“उरलेलं खाली जाऊन बोलू…”*


*ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून आर्याचे बाबा मिश्कीलीने बोलले,*


*“लवकर आलात…*


*तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करू.”*


*“हो, नक्की..” समीरच्या आई बोलल्या.*


*"मला बोलायचं आहे… सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत…” समीरच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले...*


*“का ? काही प्रॉब्लेम ?" आर्याचे बाबा म्हणाले.*


*अक्च्युअली, मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावईही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं.”*


*“म्हणजे..” आर्याचे बाबा म्हणाले.*


*“म्हणजे, तिला फक्त मी हवा आहे. माझी आई नको.*

 *माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही… तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही.”*


*“पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे…? आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून.”*


*“हो, आम्हाला नकोच आहे हुंडा… पण तुमच्या मुलीला हवाय…”*


*“काही पण बोलू नका. मी असं काही मागितलं नाही आहे…”*


*“वेल सेटल, पुण्या-मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आई-वडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही."*


*लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायलासुद्धा नको का ?*


*जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात… एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे.*


*एखाद्याला स्विकारताना त्याच्या गुण- दोषांसोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्विकारली तरच नातं खुलतं… असो ! चल आई निघू या आपण.”*


*असे म्हणून समीर निघून गेला आणि निरुत्तरीत होऊन आर्या व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते.*


*मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे, स्वत:चे चांगले घर पाहिजे, खूप बँक बँलंस पाहिजे, चारचाकी गाडी असावी आणि मुलाकडे खूप प्रापर्टी असावी...........*


*मुलीला सर्व सुखसोयी मिळाव्यात हा प्रत्येक आई वडिलांचा प्रयत्न असतो. पण मुलीला लग्नासाठी तयार करताना आई-वडिलांनी तिला आधी सासरची जबाबदारी घेणं, नाती सांभाळणं विशेष म्हणजे सासू-सासऱ्याचा स्वतःच्या आई-वडिलांसारखा सांभाळ करणं हे देखील शिकवायला हवं !*


*मुलाला शिकवायचं, नोकरी लावायची, छान घर बांधून द्यायचं अन् त्याच आई- वडिलांची अडचण कशी होऊ शकते मुलींना कळत नाही. पण आर्यासारख्या मुली समाजात बघायला मिळतात. म्हणजे नवलच म्हणावं लागेल.*


*आई- वडिलांनी रक्ताचं पाणी करून ज्या मुलाला घडवलं त्याच मुलाचं लग्न होताच आई- वडिलांनी एकदम त्याच्या आयुष्यातून एक्झीट घ्यायची. का ? तर त्यांना सुन-मुख हवंय, मुलाचं लग्न हवंय. पण अशा मुली स्वतःच्या भावांचा का नाही विचार करीत !*


*त्यांच्या येणाऱ्या वहिनींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई-वडील नको. तर मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा पण कुटुंब तोडून नाही !*


*आणि हो*


*कृपया फक्त वाचू नका तर मनःपूर्वक विचार करा ही विनंती. कारण आज संपूर्ण समाजात थोडेसे सोडले तर अशीच परिस्थिती आहे. फक्त मान्य करायला मोठं मन हवं..!* 👍🏻💯🔥🙏🏻

Beej अंकुरे अंकुरे

 अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो.


मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो.


हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.


अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,


'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'


'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात.


झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो.


शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'


त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते.


पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!


बारमाही काम करता येईल असा हा देश.


बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.


बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.


वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.


ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल..

Toll tax

 


प्रेमा तुझा रंग कसा

 #व्हॅलेंटाईन डे ला नव-याने लाल गुलाब दिल्यावर प्रतिक्रिया देणा-या वेगवेगळ्या राशींच्या बायका...(.#काल्पनिक)


*मेष*..हे काय ,भाजी आणि फुलपुडा आणायला सांगितला तर फक्त गुलाबाचा गुच्छ घेऊन आलात , आता काय गुलाबाची भाजी आणि गुलाबाची आमटी करू का ?

बिचारा कर्केचा नवरा : अगं पण....अगं पण करत राहतो.😆😆🤣


*वृषभ*...अय्या , कित्ती क्यूट गुलाब आहेत !!माझ्यासाठी आणलेत ?

वृश्चिकेचा नवरा....नाही,भांडीवाल्या शेवंताबाईसाठी आणलेत....त्यांना गुलकंद करायचाय ना ?😂😂😁😆


*मिथून*...गुलाब मस्त आहेत पण काय हो , या दिवशी गुलाबच का देतात,चाफा का नाही?"

मेषेचा नवरा....त्याचं काय आहे,की ज्याने ही प्रथा सुरू केली,तो तुझ्याइतका हुशार नव्हता ना , म्हणून...."😂😂😁


*कर्क*.....अरे वा , छान ताजी फुलं आहेत पण यात थोडी झेंडुची फुलं आणि बेल तुळस वगैरे असतं तर देवाला वाहायला झाली असती.

वृषभेचा नवरा तिला कोपरापासून नमस्कार करून निघून जातो.😆😆😂


*सिंह*....(दरडावणीच्या सुरात) वाट पाहून पाहून मीच हे गुलाब आणलेत आज व्हॅलेंटाईन डे साठी.....परत म्हणू नका,माझं प्रेम नाही तुमच्यावर...

कर्केचा नवरा आँ वासून बघत राहतो.🤓😁🤣🤣


*कन्या*...गुलाब मस्त आहेत पण गुच्छातली कडेची फुलं शिळी दिसतायत आणि सिग्नलला गुलाब विकणा-यांकडून तर घेतले नाहीत ना ? ते लोक म्हणे स्मशानभूमीतली थडग्यावरची फुलं आणून विकतात...." 😆🤣😂😂  


*तूळ*....बरं झालं बाई , गुलाबाचा मोठा गुच्छ आणलात ,आता मला गुलकंद करून बघता येईल.🤣🤣😁😁


*वृश्चिक*....लक्षात आहे म्हणायचा आजचा दिवस....प्रेमाने फुले आणलीत ती....काल रात्री तर म्हणत होतात की तुझ्यासारख्या कजाग बायकोबरोबर संसार करणं म्हणजे मूर्खपणा आहे.🤣🤣😁


*धनू*.....या एका दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या....काय अर्थ आहे ? 😁😂😂


*मकर*....या एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का ?आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या."😆😆😆


*कुंभ*....(गंभीर चेहऱ्याने ) प्रेम ही सुंदर भावना मनात असावी लागते ,अशी फुले-बिले देणं म्हणजे प्रेम नाही."🤓🤓😂


*मीन*......अरे , तू खरंच गुलाब आणलेस की , मला वाटलं , झेंडूची फुलं आणशील....ख्याख्याख्याख्या....गंमत केली ,चिडू नकोस."🤣🤣

पुढच्या वर्षी निवडुंगाचीच फुलं देतो."असे म्हणून वृश्चिकेचा नवरा रागारागाने निघून जातो.

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

 विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार


  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन


        नाशिक, दि. : 13 (जिमाका वृत्तसेवा) : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.


            ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालये या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार


            आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण -मनमाड पाणी पुरवठा योजनेस तात्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येवून त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी पाणीपुरवठामंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजने सोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील 500 कोटी

तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर

 तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर

- उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस

जीएसटी प्रणाली सुधारणा मंत्री गटाची तिसरी बैठक.

            मुंबई दि 13 :- जीएसटी करप्रणाली ही संघराज्यांतील परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. 'जीएसटी'चा कणा असलेली 'आयटी' प्रणालीही आता स्थिरावत असून तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाने विविध सूचनांना मान्यता दिली.


            'जीएसटी' प्रणाली सुधारणा मंत्री गटाची तिसरी बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. यावेळी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तमिळनाडूचे वित्त मंत्री डॉ पलानीवेल थैगा राजन, 'जीएसटीएन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सिन्हा, केंद्रीय सचिव ऋत्विक पांडे, 'सीबीआयसी' पॉलिसी विंगचे प्रधान आयुक्त संजय मंगल, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राज्य कर आयुक्त राजीव कुमार मित्तल, सचिव शैला ए आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे वित्त मंत्री बुगना राजेंद्र नाथ, दिल्लीचे वित्त मंत्री मनिष सिसोदिया, ओरीसाचे वित्त मंत्री निरंजन पुजारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            जीएसटी करप्रणालीमध्ये कर अनुपालन सुलभ, कार्यक्षम व प्रभावी असावे, यासाठी प्रशासनाची वाटचाल चालू आहे. मंत्रीगटाने बोगस जीएसटी क्रेडिट व B2C व्यवहारांमुळे होणाऱ्या करचुकवेगिरीबाबत चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्याची गरजही मंत्रीगटाने यावेळी अधोरेखीत केली.


महसूल हानी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना


            अस्तित्वात नसलेल्या (बनावट / बोगस ) आस्थापनांचा शोध आणि त्यांचा मागोवा घेणे, बनावट/बोगस क्रेडिटचा वापर होऊ नये याकरिता जीएसटी क्रेडिटचे सुयोग्य नियमन करणे, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन B2C व्यवहाराद्वारे होणारी महसूल हानी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, सेवांच्या आयातीशी संबंधित डेटाच्या प्रभावी वापरासाठी पध्दतींचा विकास करणे याबाबत मंत्री गटाने योग्य त्या शिफारशीसहित आपला अहवाल औपचारिकपणे जीएसटी परिषदेसमोर विचारार्थ ठेवण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. जीएसटी करप्रणाली अधिक बळकट करण्यासंदर्भात मंत्रीगटाने सविस्तर चर्चा केली.


----000-----


केशव करंदीकर/विसंअ/

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा

 टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन


टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या सकाळी मंत्रालयात बैठक.

            मुंबई, दि. 13 : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी टँकर असोसिएशन यांना केले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक घेऊन मुंबईतील पाणी टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करु, पण तत्पूर्वी टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.


            बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशीही यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा करुन लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.


            शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील टँकर्सनी अचानक लोकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. या टँकरधारकांशी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यास शासन कधीही तयार आहे. त्यामुळे टँकरधारकांनी लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत केले. टँकरधारकांच्या प्रश्नासंदर्भात उद्या सकाळी पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे या चर्चेत निश्चित करण्यात आले.


००००

Featured post

Lakshvedhi